Tuesday, October 11, 2016

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये..
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये..
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला
आज अम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये
अंबाबाईचा.. उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा.. उधं उधं उधं उधं उधं
सप्‍तशृंगी मातेचा.. उधं उधं उधं उधं उधं
अंबाबाईचा उदो उदो !
करुया उदो उदो उदो अंबाबाईचा
मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा
घेऊया लाभ दर्शनाचा, उदो उदो !
सार्‍या जनतेची आई, माता अंबाबाई
हाकेला उभी राही, सारं काही तीच्या ठायी
सत्य डोळ्यांनी पाही, दंड दुष्टांना देई
अनेक रूपे तीही घेई भक्तांच्या पायी
आश्विनी प्रथम दिनी, बसते सिंहासनी
होतो जयघोष माऊलीचा, उदो उदो !
तेथुनी जरा दुरी स्वामीची गगनगिरी
अंश तो परमेश्वरी, भक्ती दत्ताची खरी
गुहेत स्थान जरी, बाजुला खोल दरी
रूप ते त्यांचे जणू शिवशंकरापरी
भेटुया त्यांना चला पाहुया ईश्वरी लीला
भरे दरबार भाविकांचा, उदो उदो !
डोंगरी माथ्यावर जोतिबांचे मंदिर
जुळती दोन्ही कर पहाल मूर्ती जर
असे हे कोल्हापूर नवरात्रीला फार
करिती देवींचा तो उत्सव घरोघर
सोहळा मनोहर, रम्य तो खरोखर
सुटे मधुगंध चंदनाचा, उदो उदो !
|| श्री महालक्ष्मी स्तोत्र ||
सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे |
सिद्धचारण पूजिती जनवंदिते महावैश्णवे ||१||
त्राहि हो मज पाही हो मज पाही हो महालक्ष्मी |
हेमभावन रत्नकोन्दण हे सिंहासन आसनी ||२||
एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी |
त्यासि देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी ||३||
कुण्डले श्रवणी रवि शशि मंडळासम वर्तुळे |
डोलता सुरनायकावरि हालताती चंचले ||४||
कंचुकी कुचमंडळावर हार चंपक रुळती |
पारिजातक शेवती बटमोगरा आणि मालती ||५||
पिवळा पट तो कटी तटी वेष्टिल्या बरवे परी |
सौदामिनीहुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी ||६||
कमुकावर मन्मथे शरसज्जिल्या तैशा निर्या |
गर्जती पद पंकजी किती नुपुरे आणि घागर्या ||७||
इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती |
कुंकुमागुरु कस्तूरी किती आदरे तुज चर्चिती ||८||
निर्जळे तुज पूजिता बहु शोभिसी कमलासनी |
किती हो तुज वर्णु मी मज पाव हो कुलस्वामिनी ||९||
कोटि तेहतीस देवतांसवे घेऊनी विन्झणे करी |
चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी ||१०||
नामामृत दे निरंतर याचकाप्रती गिरीसुते |
जोडुनी कर विनवितो मज पाव हो वरदेवते ||११||
संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल अम्बिके |
कृष्णकेशव प्रार्थतो मज पाव हो जगदम्बिके ||१२||
|| जय जगदम्ब | उदयोस्तु | अंबे उदयोस्तु ||
***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १०)
आई महालक्ष्मीच्या नवरात्र उत्सवानिमित्त गेले नऊ दिवस आपण संत श्री पुरंदरदासांच्या रचनेचे निरूपण बघत आहोत. त्या निरूपणाचा, चिंतनाचा आज अंतिम भाग आपण बघणार आहोत.
खरे म्हणजे संतांनी रचलेल्या अभंगांचे,ग्रंथांचे,स्तोत्रांचे निरूपण हे संतांनीच करावे. त्यांना त्यातून नक्की काय मार्गदर्शन करायचे आहे, त्यामागील त्यांचा काय भाव आहे हे आपल्या बुद्धीच्या पलिकडचेच आहे. ते शक्य होत नसल्यामुळे आपण त्यातल्या त्यात शब्दांप्रमाणे अर्थ घेतो. पण संतांनी ते शब्दांपलिकडच्या भावातून रचलेले असते.
श्रीमध्वाचार्य एके ठिकाणी सांगतात, शास्त्र, ग्रंथांचा अभ्यास करताना भगवंताचे अधिष्ठान, त्याची कृपा का हवी, तर एका शब्दाचे किमान ४ आणि कमाल १०० अर्थ निघतात. आणि आचार्यांनी हे ऋग्वेदावरील भाष्यात आणि इतर ग्रंथामध्ये करूनही दाखवले आहे. तर अशा वेळी कोणत्या ठिकाणी नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे समजण्यासाठी भगवंताची कृपा हवी. आपल्या सर्वांमध्ये साक्षी नावाची एक शक्ती आहे. त्यानेच हे जाणता येते आणि त्या साक्षीला जागृत करण्यासाठी भगवंताची कृपा हवी. त्यानंतर जे चिंतन, निरूपण घडते ते ग्रंथ, अभंगांना सर्वार्थाने न्याय देणारे असते.
प्रस्तुत निरूपण हे शब्दांप्रमाणे जाणारेच आहे. त्याला दासांच्या भावावस्थेची जोड दिली आहे. काही गोष्टी या अंतःप्रेरणेतून घडत असतात. त्या प्रेरणेला लेखणीची जोड देणाराही भगवंतच आहे. त्याच्या प्रसादामुळेच हे निरूपण देणे शक्य झाले आणि पुढेही देता येईल. यात रचनेचा विपर्यास करण्याचा, मनाचे घालण्याचा हेतू नव्हताच आणि कदापि असणारही नाही. ज्याअर्थी दहा दिवस खंड न पडता निरूपण पूर्ण झाले त्याअर्थी ते त्यानेच करून घेतले. तथापि विद्वान,पंडित,अभ्यासक,संशोधक यांना काही गोष्टी खटकल्या असल्यास त्यांनी त्या दुरूस्त कराव्यात. बाकी सर्व जगन्मातेचरणी अर्पण!
आई, शुक्रवारी तुझ्या पुजेच्यावेळी साखर आणि तूप यांनी युक्त पंचामृताची नदी वाहत असते. यानंतर दास म्हणतात,
अक्करेयुळ्ळ अळगिरिरंगन । चोक्क पुरंदर विठ्ठलन राणि ॥
अक्करेयुळ्ळ म्हणजे प्रेमाने ओतप्रोत भरलेले, अळगिरीरंगन म्हणजे श्रीरंगमचे रंगनाथस्वामी! अळगिरीरंगा हे विशेषणात्मक वापरले आहे. चोक्क पुरंदर विठ्ठलन राणि! "चोक्क" म्हणजे शुद्ध, निष्कलंक! रंगनाथ म्हणजे नारायणच!! त्याचं वर्णन दास इथे करतात, तो प्रेमाने भरलेला आहे. ज्याच्याकडून आपल्याला प्रेम, प्रेम आणि प्रेम इतकंच मिळेल असा प्रेमानेयुक्त अळगिरीचा रंगनाथ आहे.
आणि पुढे रचनेचा शेवट करताना म्हणतात की, या पुरंदराला, या भगवंताच्या एका दासाला, शुद्ध निष्कलंक कोणी केलं? ज्याला भगवंताचा विसर पडला, त्याला त्यातून कोणी बाहेर काढलं? तर त्याच्या राणीने म्हणजेच आई लक्ष्मीने! जिने तो मायेचा डाग पुसून मला निष्कलंक, शुद्ध केले आणि भगवंताच्या प्रेमाचा अनुभव दिला. अशी त्याची राणी महालक्ष्मी मी तुला बोलवत आहे!
दास रचनेच्या शेवटी रंगनाथस्वामींचा विशेषकरून उल्लेख करतात, त्यावरून दास श्रीरंगनाथाच्या इथे असतानाच त्यांनी रचना केली असावी असे वाटते. त्या परब्रह्म नारायणाचे प्रेम आम्हाला लाभावे म्हणूनच आम्ही तुझ्याचरणी राहावं म्हणजे तेथून वाहणाऱ्या भक्ती, विवेकाचा स्पर्श आम्हाला होईल.
आज विजया दशमीच्या दिवशी हेच मागणं आईकडे मागूया. ती भगवंताचे जे दास्य करते, ती जशी त्याची शुद्ध भक्ती करते त्यातली थोडीतरी आपल्याला जमावी, जेणेकरून त्या भगवंताचे प्रेम आपल्याला मिळेल, आपल्या योग्यतेनुसार त्याचे ज्ञानानंदादि गुणांनी युक्त असे स्वरूप जाणता येईल आणि तेव्हाच आपले या जन्म मरणातून, बंधनातून सीमोल्लंघन होईल. संपूर्ण रचनेतील प्रत्येक पदाचा शब्दांप्रमाणे अर्थ देत आहे.
सौभाग्य प्रदान करणाऱ्या माझे आई तू ये ॥
पायावर पाय ठेवून ये, त्या पायातील पैंजणांचा आवाज करत ये ।
तुझ्या येण्याने साधू सज्जनांच्या अंतरंगात मंथन चालते आणि ताकातून लोणी वर यावे, तशी त्यांच्या अंतरंगातून भक्ती वर येते ॥१ ॥
कनक म्हणजे सोन्याची वृष्टी करत तू ये, आमच्या मनोकामना पूर्ण कर ।
कोटी सूर्यांचे तेज जसे असते, तसे तुझे दैदीप्यमान रूप आहे. हे जनक राजाच्या कुमारी सीते तू ये ॥ २ ॥
सैरावरा न पळता भक्तांच्या घरामध्ये राहा, म्हणजे तेथे नित्य महोत्सव आणि नित्य सुमंगल घडेल ।
साधू सज्जनांना सत्य दाखवणारी अशी तू आहेस, त्यांच्यामध्ये तेजाने दैदीप्यमान होऊन तूच राहतेस ॥ ३ ॥
तू असंख्य भाग्य प्रदान करणारी आहेस आणि याबद्दल मला काहीच शंका नाही. तू तुझ्या हातातील कंकणांचा आवाज करत ये ।
तुझ्या कपाळी कुंकुम लावलेले आहे. तुझी लोचने कमलासम आहेत. तू वेंकटरमणाची म्हणजेच भगवान व्यंकटेश नारायणांची राणी आहेस ॥ ४ ॥
साखर आणि तूप हे, शुक्रवारी तुझ्या पूजेच्या वेळी, तुझ्याचरणी वाहत असते ।
पुरंदराला, शुद्ध निष्कलंक करणाऱ्या, प्रेमानेयुक्त अशा रंगनाथाच्या राणी तू ये ॥ ५ ॥
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ९)
दासपरंपरेतील दासश्रेष्ठ संत श्रीपुरंदरदास यांच्या भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या रचानेचे निरूपण, दासांच्या भावावस्थेचे चिंतन आपण गेले काही भाग बघत आहोत. या भावावस्थेला दास पोहोचले ते आई लक्ष्मीची कृपा झाली म्हणूनच. त्यानंतर स्वतःचे असे काहीच राहिले नाही. हे विश्व म्हणजेच घर, या विश्वाचे म्हणजेच एका अर्थाने आमचेही माता-पिता म्हणजे ती महालक्ष्मी आणि भगवान नारायण.
आपण लहान असताना आपल्याला काही हवे असले तर आपण आधी आईकडेच जातो.. हे स्वाभाविक आपल्याकडून घडते. आपल्याला कुणी तसे शिकवलेले नसते की, आई जवळची वडील लांबचे.. आईकडे आपला स्वाभाविक ओढा असतो. मग आईकडून आपला जो काही प्रस्ताव असतो तो वडिलांकडे जातो. आई महालक्ष्मी आणि भगवंताच्या बाबतीत अगदी असाच प्रकार असतो... आईच आपल्याला भगवंतापर्यंत नेते.
सद्गुरूपद याहून निराळे. ते या लक्ष्मी नारायण माता-पित्यांपर्यंत आपल्याला नेतेही आणि आपल्यासाठी माता-पिता होते देखील. तो आत्ताचा प्रतिपाद्य मुद्दा नाही. पण या तत्त्वांकडे आपल्या पालकांप्रमाणे बघता आले तर त्यांच्याशी संवाद सुरू होतो. क्षणभर आपलं या जगात कुणी नाही असं धरून चाला. आपण अनाथ आहोत. मग आयुष्यातील काही कटु, दुःखद प्रसंगांमधे आपल्याला सहाजिकपणे भरून येतं.. मला कुणीच नाही हे दुःख सांगावं कुणाला? ही भावनिकता भगवंताकडे वळवता आली पाहिजे. काकुळतीला येऊन महालक्ष्मी म्हणजेच आपली आई आहे, सांगावं तिला आपलं सगळं.. काहीही होवो पण या आईच्या मांडीवर अगदी हक्काने डोकं ठेवता येतं हा भाव मनात दाटला पाहिजे. या भावातून कधीतरी भगवंताकडे, या जगन्मातेकडे आपल्याला बघता आलं पाहिजे. यासाठी संतांचे अभंग अभ्यासायचे. त्यांनी जसे त्वमेव माता च पिता त्वमेव हे अनुभवले, तसा अनुभव आपल्याला येण्याकरीता संतांच्या रचनांचे चिंतन गरजेचे आहे.
या रचनेचे शेवटचे पद आपण आज आणि उद्या पाहणार आहोत. आई लक्ष्मीला बोलवून तिच्या रूपाचे, कार्याचे वर्णन करून दास शेवटी त्यांनी हे पद कुठे रचले असावे याची एकप्रकारे साक्ष आपल्याला देतात. म्हणजे त्यावरून तसा निष्कर्ष निघू शकतो. दास म्हणतात,
सक्करे तुप्पद कालुवे हारिसि । शुक्रवारद पूजेय वेळेगे ॥
सक्करे म्हणजे साखर, तुप्प म्हणजे तूप. कालुवे म्हणजे पन्हाळ कशी असते त्यासारखे. हारिसि म्हणजे वाहते. शुक्रवारी तुझ्या पुजेच्यावेळी साखर तुप यांनी युक्त पंचामृताची एकप्रकारे नदी वाहत असते. पण दासांनी येथे तुप आणि साखर याचाच प्रामुख्याने उल्लेख केला आहे. पंचामृत हा एक अर्थ आहेच पण दुसरा अजून एक अर्थ असाही होतो की,
येथे तुप आणि साखर प्रतिकात्मक आहे. तुप हे बुद्धीवर्धक आहे म्हणजेच विवेक. आणि साखर मधुर, शुद्ध, सत्त्व असणारे म्हणजेच भक्ती. ही विवेक आणि भक्तीची नदी एकप्रकारे तुझ्या आश्रयी वाहत असते. आणि त्याने काय होतं? आम्ही काय करावं? हे पुढच्या पदात सांगतात ते उद्याच्या अखेरच्या भागात जाणून घेऊ.
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

Sunday, October 9, 2016

***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ८)
हे आई महालक्ष्मी, तू मला असंख्य भाग्य प्रदान करशील किंवा तू मला भाग्य प्रदान करशील याबद्दल मला काही शंका नाही. असे भाग्य प्रदान करणारी तू आहेस हे सर्वांना कळू दे यासाठी तू तुझ्या हातातील कंकणांचा आवाज करत ये म्हणजे तुझ्या मायारूपी निद्रेतून आम्ही बाहेर येऊ आणि भगवंताचे ज्ञान आम्हाला होईल. यापुढे दास म्हणतात,
कुंकुमांकिते पंकज लोचने । वेंकटरमणन बिंकद राणि ॥
कुंकुम तुझ्यावर शोभून दिसत आहे. तुझ्या कपाळी कायम कुंकु लावलेले असते. दास येथे म्हणतात की, कुंकु, कुंकुम तुझ्या कपाळी लावलेले आहे आणि तुझे लोचन, डोळे कसे आहेत? तर तू पंकज लोचन आहेस. पंकज म्हणजे कमळ. मागील एक भागात सांगितल्याप्रमाणेच, भगवंताच्या हातातील पद्म, कमळाची उपमा ही मोक्षाशी केलेली आहे. आणि ही आई महालक्ष्मी जी नित्य त्या भगवान नारायणाच्या सान्निध्यात असते ती पंकज लोचन आहे म्हणजे केवळ तिच्या कृपादृष्टीने, कृपाकटाक्षाने आपल्याला तो मोक्षाचा मार्ग सापडतो, तो भगवंत सापडतो. हे आई अशी तू कुंकुमधारण केलेली आणि पंकज लोचन असलेली आहेस. पुढे म्हणतात,
वेंकटरमणन बिंकद राणि ॥
वेंकट रमणाची पत्नी. भगवान व्यकंटेशाची म्हणजेच भगवान नारायणांची राणी. पण तू कशी राणी आहेस तर. बिंकद म्हणजे यायला नाटकं, नखरे करणे. बोलावल्यार लगेच न येणे. पण येथे दास अगदी तशाच्या तशा अर्थी म्हणत नाहीत. म्हणजे बोलावल्यावर तू लगेच येत नाहीस. त्यामुळे तुला सारखे बोलावावे लागते. तुला सारखे आळवावे लागते. अशी तू आहेस आणि तेच मी करत आहे. कपाळी कुंकुम असलेली, कमलासम लोचन असलेली, तू वेंकटरमणाची म्हणजेच नारायणाची राणी आहेस.
पांडुरंगाची लीला -
पुरंदरदासांना प्रत्यक्ष पांडुरंगाने व्यासतीर्थांकडे जाण्यास सांगितले होते. त्यांची नाममुद्रा "पुरंदर विठ्ठल" अशी आहे. विठ्ठल, पांडुरंगच त्यांचे आराध्य होते. पंढरपूर क्षेत्री राहून त्यांनी खूप पदे रचली. आजही पंढरपुरात पुरंदर खांब म्हणून आहे. पंढरपूरला पुरंदरदास नेहमी येत असत. असेच एकदा दास पंढरपूर क्षेत्री असताना घडलेली घटना आपण पाहणार आहोत.
एका रात्री मृत्तिका शौचास जाताना शिष्य अप्पण्णा भागवतास पाणी बाहेर आणून देण्यास सांगितले अप्पण्णा झोपेतच "हो" म्हणाला आणि झोपी गेला. इकडे दास शिष्याची वाट पाहून कंटाळले. आणि अश्याच अवस्थेत घरी येणेही त्यांना योग्य वाटेना. त्याचवेळी पांडुरंगच अप्पण्णा भागवताचे रूप घेऊन आला आणि त्याने पाण्याचा तांब्या दासांसमोर ठेवला. अंधारात दासांना नीट दिसले नाही पण अंधुकसे दिसले की हा अप्पण्णा भागवतच आहे. दासांनी शुद्धी कार्य आटोपून, "काय रे अप्पण्णा, इतका का वेळ लावलास?" म्हणून तांब्या त्याच्या दिशेने भिरकावला तो त्याच्या डोक्याला लागला. अप्पण्णा, "चूक झाली, गुरूजी" म्हणत निघून गेला.
दास घरी आले. अप्पण्णालाही जाग आली. "झोप लागली गुरूजी, विसरलो! हे पहा आत्ता पाणी आणतो." असे म्हणत अप्पण्णा अंगणात आला.
"अप्पण्णा कुठे चाललास? अरे शुद्धीत आहेस ना? माझा तांब्या कुठे ठेवलास?" दास म्हणाले.
"कसला तांब्या गुरूजी?" अप्पण्णा.
"अरे आत्ता मगाशी नाही का मी तुला दिला." दास.
"नाही गुरूजी, मी तर इथेच झोपलो होतो." अप्पण्णा म्हणाला.
"अरे, शेतात तू पाणी आणून दिलेस. आणि मी तो तुझ्याकडे भिरकावला नाही का?" दास म्हणाले.
"गुरूजी अहो खरोखर मी आलो नव्हतो." अप्पण्णा.
"अस्स! मग शेतात कोण आले होते?" दास विचारत पडले. आणि दासांना कळले. पांडुरंगा! काय रे हे देवा माझ्या हातून नीच कर्म करून घेतलेस? असे म्हणत नामस्मरण करत बसले.
काकड आरतीची वेळ आली होती. नित्याप्रमाणे काकड आरती झाली. नंतर भगवंतास अभिषेक सुरू करण्याच्या वेळी पुजाऱ्यांनी मुकुट काढला तेव्हा पाहिले तर डोक्याला टेंगूळ आले आहे असे दिसले आणि भगवंताच्या डोळ्यातून पाणी येत आहे. पुजाऱ्यांना हे काहीच कळेना. पुरंदरदास देवळात भजन करत बसले होते. सर्वांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. पुरंदरदासांनी तंबोरा खाली ठेवला. गाभाऱ्यात गेले. भगवंताच्या मूर्तीवरून हात फिरवला. आणि म्हणाले,
"देवा कसले रे हे तुझे विडंबन? महाभारत युद्धात भीष्म-द्रोणांच्या बाणापेक्षा माझा तांब्याने केलेला प्रहार इतका तीक्ष्ण झाला का? पाणी घेऊन तूच आलास ना? अप्पण्णा भागवतास झोप तूच आणलीस ना? पुरे झाले रे हे विडंबन आता." हात फिरवत असताना हळू हळू टेंगूळ नाहीसे झाले आणि अश्रूही थांबले. दास आनंदपूर्ण साश्रुनयनांनी पुजाऱ्यांना म्हणाले, "काही काळजी करू नका अभिषेक चालू करा. भगवंताला त्याच्या भक्ताबरोबर खेळताना लागले होते."
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

Saturday, October 8, 2016

Jnaneswara offers the highest kind of consolation to those who have lived wretched and sinful lives. He gives hope even to the fallen. He tells us that even these, if they but conceive love towards God, have in them the power of reaching God. (Jnanesvari IX.418-428)
(Page 110, Chapter III, Mysticism in Maharashtra, R D 


Week 809
If we follow the track of those who have gone before us, we cannot see any returning footprints. The histories and mythologies of this world are merely collections of death-stories. It is wonderful that people should live at ease in such a world !........Alas, born in this mortal world, O Arjuna, get thyself hastily from it; go by the path of Bhakti, so that thou mayest reach My divine home. (Jnanesvari IX. 490-516)

**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ६)
इकडे तिकडे कुठेही न जाता भक्तांच्या घरामध्ये तू स्थिर राहा म्हणजे तेथे नित्य महोत्सव आणि नित्य सुमंगल घडेल अशी विनवणी करून दास पुढे म्हणतात,
सत्यव तोरूत साधु सज्जनर । चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥
हे आई, साधु सज्जनांना तुझ्यामुळे सत्य बघता येते, जाणता येते. त्यांना सत्य दाखवणारी तू आहेस. इथे चित्तदि म्हणजे चित्त हा अर्थ नाही. सोने जसे चकाकते, त्याचे जसे तेज असते, त्याने दैदीप्यमान झालेल्या, मोहक अशा एका बाहुलीसारखे तुझे रूप आहे. गोंबे म्हणजे बाहुली. पुत्थळि म्हणजे मोहक किंवा क्षणात आवडेल असे.
आई महालक्ष्मीची कृपा असल्याशिवाय साधना सुरूच होत नाही. सकल जीवांची आई आहे ती. आई श्रेयस्कर देते, प्रेयस्कर नाही. सत्य दाखवणारी अशी ती आहे. आणि आपण भगवंताचा हट्ट धरलेला आईला आवडतो. ती खचितच तो हट्ट पुरवते. त्या परब्रह्म भगवान नारायणापर्यंत जी पोहोचवते ती ही आई महालक्ष्मी. भगवंताच्या शंख, चक्र, गदा, पद्म यातील पद्म हे मोक्षाचे प्रतिक मानले गेले आहे. शांती, सत्त्व, मोक्ष प्रदान करणारे. आणि आई महालक्ष्मी तोच मार्ग दाखवते. याविषयी श्रीसूक्तात वर्णन येतेच, पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मालये पद्मदलायताक्षी । असा मोक्षाचा मार्ग ही पद्मरूपी लक्ष्मी प्रदान करते. आपल्या सर्वांचा प्रवास हा अनित्यात राहून शाश्वत सत्यासाठीच तर चालला आहे. तो सत्याचा मार्ग दाखवणारी तू आहेस आई.
आणि पुढे तिच रूप कसं आहे याविषयी सांगतात, चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥
बाहुली कशी मोहक असते. येथे मोहकचा शब्दशः अर्थ घेणे योग्य ठरणार नाही. पण अशी गोष्ट जी सहज आपल्याला आवडते आणि आपली होऊन जाते. असा गुण जिच्यात आहे अशी बाहुलीसारखी आणि त्याचबरोबर सोने, चांदी, हिरे हे जसे चकाकतात आणि त्याचे जे तेज असते त्याने प्रकाशित झालेले असे तुझे रूप आहे.
दासांच्या जीवन चरित्रातील एक कथा आपण आज पाहणार आहोत.
विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हा पुरंदरदासांना भेटायला उत्सुक होता. नवकोट नारायण, सावकार, सर्वस्व त्याग करून हरिदास बनतो ही गोष्ट राजाला खूपच आश्चर्यकारक वाटत होती. अखेर एक दिवस राजा आणि दासांची भेट झाली. राजाने त्यांचा अन्न वस्त्र आभरणांनी सन्मान केला. पण दासांनी हे सर्व गावातील गोर-गरीबांना वाटून टाकले. राजाने त्यांचा सन्मान केला होता खरा, पण तो शिष्टाचाराचा भाग म्हणूनच. त्याला दासांचे श्रेष्ठत्त्व अजिबात कळले नव्हते.
पुरंदरदास रोज भिक्षा मागत, तेव्हा ते राजवाड्यासमोरही भिक्षेसाठी उभे राहत. तेव्हा राजवाड्यातून त्यांना रत्नमोतींनी भरलेल्या सुपाने भिक्षा दिली जात असे. आणि त्यामुळे त्या हिऱ्या,रत्नांचे खडेही भिक्षेत पडत असत. दोन तीन दिवस हा सततचा चाललेला प्रकार पाहून राजाला संशय आला. राजा व्यासतीर्थांकडे आला आणि म्हणाला, " स्वामी तुम्ही तर पुरंदरदासांना वैराग्यमूर्ति म्हणता, त्यांच्यावरती गौरव करणारी पदे रचता, पण ते तुमचे दास किती लोभी आहेत पहा. तीन दिवस रत्न, मोती देऊनही अजून त्यांची तृप्ति झालेली नाही. नित्य भिक्षेला येतात." हे ऐकून व्यासतीर्थ म्हणाले, "असे होय. चल आपण जाऊन बघुया कसे आहेत दास."
पुरंदरदास गावाबाहेरील मारूतीच्या मंदीरात राहायचे. तिथे राजा आणि स्वामी दोघेही आले. आणि बघतात तर देवळाबाहेर कोपऱ्यात मोती रत्नांचा ढीग पडला होता. दासांची पत्नी भिक्षेच्या झोळीतून खडे, कचरा म्हणून जे काही टाकत होती, ते दास बाजूला कचऱ्यात जमा करत होते त्याचाच हा ढीग जमा झाला होता. "अलिकडे दोन-तीन दिवस भिक्षेत खूपच कचरा येतोय नाही?" दासांचे आणि त्यांच्या पत्नीचे हे उद्गार ऐकून राजा लज्जित झाला. त्याने व्यासतीर्थ आणि पुरंदरदासांची क्षमा मागितली. आणि दास खरोखरच वैराग्यमूर्ति आहेत असे गौरवोद्गार काढले.
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ७)
मागील भागात आपण सत्यव तोरूत साधु सज्जनर । चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥ या पदाचा अर्थ पाहिला. साधू-सज्जनांना सत्य दाखवणारी अशी तू सोने जसे चकाकते त्या तेजाने दैदिप्यमान होऊन मोहक अशा बाहुलीच्या रूपामध्ये त्यांच्यात स्थित असतेस. यापुढे दास म्हणतात,
संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु । कंकण कैय तिरूवुत बारे ॥
या पदामध्ये दोन पाठभेद आहेत. शंकेयिल्लद किंवा संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु । दोन्हींचा अर्थ आपण येथे बघणार आहोत.
पहिल्याचा अर्थ असा की, दास म्हणतात, हे आई तू मला भाग्य प्रदान करशील याबद्दल मला काही शंका नाही. निःशंक होऊन मी तुला बोलावत आहे. आणि तू येऊन भाग्य प्रदान करशील हे मला ठाऊक आहे. एकाप्रकारे दासांना ते भाग्य आईने आधीच प्रदान केलेले असल्यामुळे दास निःशंक आहेत. दासांना त्यांच्या जीवनाचे खरे कार्य कळले. दासांना
भगवंताचे स्मरण झाले. हे परम भाग्य दासांना या लक्ष्मीनेच प्रदान केले. म्हणूनच दास म्हणतात आई तू मला भाग्य प्रदान करशीलच. मला यात अजिबात शंका नाही.
दासांचा भाव स्वतःसाठी जसा असतो तसाच तो सर्व जीवांसाठी असतो. मागणं स्वतःसाठी जितकं आहे तितकच ते सर्वांसाठी आहे. कारण संतांची दृष्टी विशाल झालेली असते. माझं घर, मी अमुक अमुक हा भावच तेथून गेलेला असतो. आपण सर्वजण हे त्या भगवंताचेच आहोत. हे विश्व आपल्या सर्वांचेच घर आहे. असा विशाल आणि शुद्ध भाव दासांचा झालेला असल्यामुळे माझ्या घरी ये आणि काहीतरी प्रदान कर म्हणजे या विश्वात ये आणि यातील सर्वांना प्रदान कर असा वैश्विक भाव दासांचा आहे. आणि ते तू प्रदान करशील याबद्दल मी निःशंक आहे.
दुसऱ्याचा म्हणजे जे प्रचलित आहे त्याचा, संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु । अर्थ असा की, तू अगणित असे भाग्य प्रदान करणारी आहेस. तुझे भाग्य हे असंख्य आहे. संख्येत मोजता न येण्यासारखे. असे अगणित, असंख्य, अमेय भाग्य प्रदान करणारी तू आहेस. वास्तविक पाहता, व्यवहारातील लक्ष्मी आणि मोजणे यांचा खूप जवळचा संबंध आहे. लक्ष्मीला मोजलेच जाते, तिला संख्येत तोललेच जाते. पण दास म्हणतात, तू खरी तशी नाहीस. व्यावहारीक लोक जरी तसे करत असले तरी तू त्या अनंताची पत्नी आहेस. तुलाही अंत नाही. तुला मोजता येत नाही.. मेय म्हणजे संस्कृतमध्ये मोजणे अमेय म्हणजे जे मोजता येत नाही असे. अशी तू आहेस. असे भाग्य प्रदान करणारी आहेस.
पुढे म्हणतात,
कंकण कैय तिरूवुत बारे ॥
म्हणजे हातातील बांगडीसारखा एक दागिना त्याचा आवाज करत ये. पहिल्या पदात दास म्हणतात पायातील पैंजणांचा आवज करत म्हणजे त्याने काय होईल तर, तुझंच रूप असलेल्या मायेत आम्ही गाढ निद्रेत आहोत, आम्हाला भगवंताचे स्मरण नाही, अशा निद्रेतून त्या तुझ्या पैंजणातील आवाजामुळे आम्हाला जाग येईल. म्हणजेच आमची मायेतून सुटका होईल आणि भगवंत सापडेल. तशाच काहीशा भावातून दास इथेही म्हणतात की, हातातील बांगड्यांचा, कंकणांचा आवाज करत ये. तीच तू आणि भगवंत आल्याची खूण आहे. म्हणजे आमच्यावर तुम्हा दोघांची पूर्ण कृपास राहील.
पुरंदरदासांच्या पदांचे महत्त्व आपण एका प्रसंगातून जाणून घेऊया.
एकदा पाठ चालू असताना व्यासतीर्थांनी पुरंदरदासांची पदे म्हणजे "पुरंदरोपनिषद" असा सन्मान करून ती मध्वाचार्यांच्या सर्वमूल ग्रंथाबरोबर व्यासपीठावर ठेवून त्यांची आरती केली. हे तथाकथित पंडितवर्गाला अजिबात सहन झाले नाही. ह्या सराफाने केलेली पदे भजने ही कितीही सुंदर असली तरी ती आचार्यांच्या सर्वमूलग्रंथांबरोबर ठेवणे म्हणजे खूपच झाले. स्वामी ती तुम्ही आचार्यांच्या ग्रंथांबरोबर ठेवू नका असा आग्रह त्या मंडळींनी धरला. व्यासतीर्थ स्वामी हसले आणि म्हणाले, "मी ती तिथे ठेवलेलीच नाही आहेत. ती आपोआपच मूलग्रंथांकडे खेचली जात आहेत. खोटे वाटत असेल तर तुम्हीच बघा." पंडितवर्गाने एक-एक करून पुरंदरदासांची पदे व्यासपीठावरून भिरकावून द्यायला सुरूवात केली पण काय आश्चर्य ती परत जशीच्या तशी व्यासपीठावर स्थापित होत होती. असा दासांच्या पदांचा महिमा आहे. अर्थात त्यावेळच्या पंडितवर्गाला तो कळलाच नाही. हा दासांच्या इंद्रजाल विद्येचा प्रकार असावा असे म्हणून ते विरोध करतच राहिले.
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

Thursday, October 6, 2016

**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ४)
भगवंताने दासांचे विषयांमधील मन, विषयाभिमुख वृत्ती एकाप्रकारे व्यवहारातील लक्ष्मीचा आधार घेत स्वतःकडे वळवली होती. आणि त्यामुळे आई महालक्ष्मीचे खरे कार्य दासांनी जाणले होते. त्याच भावातून दासांची ही रचना प्रकट होते.
क्षणार्धात बरीच वर्षे जपत आलेल्या सावकारी, घरादारावर, पैशा-आडक्यावर दासांनी तुळशीपत्र ठेवले होते. आणि शेवटपर्यंत मुखी नाम, भिक्षा मिळाल्यास खायचे पण गावोगावी भगवद्भक्तीचा महिमा गात जायचे इतकेच दासांनी केले. भगवंताचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हे दोन्हीही तूच प्रदान करतेस आई. त्या सावकारी आणि पैशाच्या मायेत मी गुरफटलो की भगवंताला विसरलो, त्याने सोपवलेले कार्य विसरलो. पण तू कृपा केलीस आणि भगवंताचे स्मरण मला झाले. अशीच कृपा तू सर्वांवर कर. दास पुढील पदात म्हणतात,
कनक वृष्टिय करेयुत बारे । मन कामनेय सिद्धिय तोरे ॥
कनक वृष्टिय करेयुत बारे ।
म्हणजे सोन्याची वृष्टी करत ये. आता अर्थात येथे दासांसाठी कसले आले सोने अन् कसली सोन्याची वृष्टी? दासांची भावावस्था या सर्वापलिकडे गेलेली आहे, अजून एका रचनेत दास म्हणतात, "हे श्रीरंगा, हे श्रीहरी, मला काही नको, तुझे नाम एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे." ही रचना, हे पद पाहता सर्वसामान्यांना असं वाटू शकतं की, अमाप संपत्ती ज्यांच्याकडे होती, जसं लक्ष्मी पाणी भरत होती असे म्हणतात, अशी परिस्थिती ज्यांची होती त्या दासांनी, ते सर्व सोडले आणि तरीसुद्धा दास पुन्हा लक्ष्मीला बोलावत आहेत? आपल्याला अभिप्रेत लक्ष्मी, तिचे कार्य आणि दासांचा या रचने मागील संदेश यात फरक आहे. सर्वा संतांच्या रचना या आपल्या बुद्धीच्या पलिकडच्या असतात. वरवर पाहून अर्थ लावणे हे योग्य नाही किंबहुना साधकांसाठी ते हिताचे नाही. पण या रचनेचे अजून एका बाजूने चिंतन करायचे झाल्यास दास सर्वांसाठी आई लक्ष्मीकडे मागणं मागत आहेत. प्रपंचात ज्यांना लक्ष्मीची कृपा हवी आहे त्यांच्यासाठीही आणि परमार्थात तिची कृपा हवी आहे त्यांच्यासाठीही!
येथे दासांचा भाव, तू कृपेची वृष्टी करत ये, तुझी कृपा हे माझ्यासाठी सोनं आहे असा आहे. सोनं म्हणजे जे उच्च, उत्तम, श्रेष्ठ याअर्थी तशीच, तुझी कृपा आहे की याहून आता श्रेष्ठ काही नाही, अशा कृपेची वृष्टी करत तू ये. तुझ्या कृपेची वृष्टी तू सर्व जीवांवर करावीस म्हणून मी तुला बोलावत आहे. पुढे दास म्हणतात,
मन कामनेय सिद्धिय तोरे ॥
तू सर्वांच्या मनोकामना सिद्धीस ने. ज्यांना प्रपंचात तू हवी आहेस त्यांच्याही आणि परमार्थात तू हवी आहेस त्यांच्याही! पुढे म्हणतात,
दिनकर कोटि तेजदि होळेयुव । जनकरायन कुमारि बेगा ॥
दास आणि आई लक्ष्मीमधे चाललेला हा संवाद आहे. दासांनी तिला पाहिले आहे. तिचे वर्णन दास येथे करतात तू कशी आहेस? तर कोटी सूर्यांच्या प्रकाशाचे जसे तेज झळाळते, "होळेयुव" म्हणजे दैदीप्यमान. त्या तेजाने दैदीप्यमान असे तुझे रूप आहे. अशा जनक रायाच्या हे कुमारी म्हणजेच सीते तू ये. भगवान नारायण आणि महालक्ष्मी यांच्यात रामवतारामध्येच वियोग झाला. कृष्णावतारामध्ये तसे नाही. सीतामाई म्हणजे साक्षात लक्ष्मीच! त्यामुळेच दास अतिशय योग्यरितीने सीतामाईचा उल्लेख करतात आणि आई लक्ष्मीच्या त्या रूपाला बोलावण्याचे कारण हेच की, वियोग हा बाह्य स्वरूपाने झाला असला तरी अंतरंगातील अनुसंधानात खंड नाही! आणि तेच आमच्याकडूनही साधले जावो, बाह्यांगाने भगवंता तुझ्यापासून मी विलग झालो तरी अंतरंगात तुझे अनुसंधान सदैव आमच्याकडून राहो हे शिकवण्यासाठी, अशा कृपेची वृष्टी करण्यासाठी हे सीते तू ये!
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)
मागील भागात सांगितल्याप्रमाणे या रचनेचा अभ्यास, या रचनेचे चिंतन लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्हीही अंगांनी करता येते. पण चिंतनाचा गाभा हा दासांची भावावस्था हा आहे. त्याला केंद्रस्थानी धरून आपण या रचनेचे निरूपण बघत आहोत. कनक म्हणजे सोन्याची वृष्टि करत ये, प्रपंचात जी लक्ष्मीची कृपा लागते ती असावीच इत्यादि सर्व हे दासांना मान्य आहेच आणि या रचनेतून दास ते प्रकटसुद्धा करतात. प्रापंचिकांना जे हवे आणि पारमार्थिकांना जे हवे ते दे हा भाव दासांचा आहेच. दासांचं मागणं माझ्या स्वतःसाठी तू सोन्याची वृष्टी करत ये हे नाही, हे लक्षात घ्यावे. इथे वैयक्तिक दास आणि त्यांचा भाव लक्षात घेऊन थोडया वेगळ्या अनुषंगाने या रचनेचा आपण अर्थ बघत आहोत. या निरूपणा व्यतिरिक्त संपूर्ण रचेनचा शब्दांप्रमाणे जसाच्या तसा अर्थ शेवटच्या भागात देत आहे. पुढील पदात दास म्हणतात,
अत्तितगलदे भक्तर मनेयोळु । नित्य महोत्सव नित्य सुमंगल ॥
"अत्तितगलदे" म्हणजे सैरावरा न पळता. इकडे-तिकडे न जाता. चंचलता हा लक्ष्मीचा गुण आहे. एका जागी ती स्थिर नसते. म्हणून दास तिला विनवणी करतात की, इकडे तिकडे जाऊ नकोस, एका जागी स्थिर राहा. "भक्तर" म्हणजे भक्तांच्या, "मनेयोळु" म्हणजे घरामध्ये. भक्तांच्या घरांमध्ये तू स्थिर राहा. कारण तू जेव्हा स्थिर राहतेस तेव्हा त्या घरांमध्ये नित्य महोत्सव नित्य सुमंगल ॥ सदैव महोत्सव चालतात, तेथे नित्य,सदैव सुमंगलच घडते.
दासांनी भगवंतालाच घट्ट धरून ठेवले आहे. वैयक्तिक दासांसाठी भगवंत त्यांच्याबरोबर असल्याने लक्ष्मीसुद्धा त्यांच्याकडे नित्य आहेच. या पदातून ते सर्वांसाठी मागणं मागत आहेत की तू भक्तांच्या घरांमध्ये स्थिर राहा जेणेकरून तेथे नित्य सुमंगलच घडेल. घरादारावर तुळशीपत्र ठेवल्यानंतर व्यासतीर्थांकडे जाऊन दासांनी हरिदास दीक्षा घेतली तो कथाभाग आपण पाहूया. त्यातून दासांची वृत्ती कशी पालटली हे कळते आणि रचनेत ते स्वतःसाठी नक्कीच काही मागणं मागत नाहीत हे कळते.
हंपीला व्यासतीर्थ गुरूंकडे जात असताना वाटेत अरण्यात सरस्वतीबाईंना भिती वाटू लागली आणि त्यांनी तसे नायकांना सांगितले. "सर्वस्व त्याग करून निघालो असताना भिती कशाची?" असे नायक म्हणाले. नायकांनी "बरोबरचे गाठोडे पाहू", म्हणून सरस्वतीबाईंना ते सोडायला लावले. "त्यात काही नाही. पाणी पिण्याकरीता फक्त एक सोन्याचे फुलपात्र आहे." असे सरस्वतीबाई म्हणाल्या. "हे पहा, या सोन्याच्या पात्रामुळेच तुला भय वाटत आहे." असे म्हणून नायकांनी ते पात्र अरण्यात भिरकावून दिले. आता "भिण्याचे कारण नाही, भगवंत आपल्याबरोबर आहे, आपण गुरूंकडे जात आहोत, काळजी नसावी" असा धीर दिला आणि पुढची वाट चालू लागले.
चक्रतीर्थ हंपी येथे येताच तेथील सर्व परिसराचे दर्शन घेत घेत व्यासतीर्थांपर्यंत येऊन नायक थांबले. व्यासतीर्थ तेव्हा शिष्यांना पाठ सांगत बसले होते. नायकाने त्यांना नमस्कार केला. हात जोडून गुरूंसमोर नायक उभे राहिले. त्यांना बघताच स्वामी म्हणाले, "यावे नायक. मी तुमचीच वाट पाहात होतो. चालत आलात का? काही अडचण तर आली नाही ना? श्री नारायणानेच तुमची परीक्षा घेतलेली आहे. पाठ संपतच आहे. एवढ्यात पुजा नैवेद्य होईल. तीर्थ प्रसादानंतर आपण बोलूया."
नायकांनी स्वामींचे हे सर्व बोलणे ऐकून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तीर्थ प्रसादानंतर स्वामींनी नायकाला गुरूपदेश केला. मंत्रोपदेश दिला. भागवत धर्माची दीक्षा दिली. त्या दिवसापासून नायक हरिदास झाले. "पुरंदर विठ्ठल" या नाममुद्रेने भगवंताची पदे रचून सेवा करावी आणि भगवंताचे माहात्म्य जनास सांगावे अशी आज्ञा व्यासतीर्थांनी केली. गुरूंच्या पूर्णकृपेनंतर पहिलेच पद त्यांनी रचले ते म्हणजे "कृष्णमूर्ती कण्ण मुंदे निंतिद्दतिदे." म्हणजे श्रीकृष्णच माझ्या डोळ्यांपुढे उभा आहे.
असे हे पुरंदरदास रोज स्नान आन्हिक आटोपून, तंबोरा वाजवत भगवंताचे भजन करीत करीत ग्रामप्रदक्षिणा करत. त्यांची चारही मुले त्यांच्या समवेत मृदुंग टाळ वाजवीत असत. त्यांनी पदे गायला सुरूवात केली प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्यापुढे नाचत असे. नगरातील लोकांच्या घरातून जे काही झोळीत मिळेल त्यावरच संतुष्ट होऊन आपली दिनचर्या ते चालवत असत. उद्याकरीता म्हणून काही संग्रह करायची त्यांची वृत्ती राहिली नव्हती. आपल्याला अन्न मिळाले तर त्यातील राहिलेले अन्न भुकेलेल्यांना, जनावरांना देणे किंवा चक्रतीर्थातील जलचरांना ते देत, पण संग्रह काहीच करून ठेवत नसत. या त्यांच्या वृत्तीप्रमाणे वागणाऱ्या घरांना कर्नाटकात "अरे, याच्याकडे नसेल काही संग्रही, हे तर पुरंदरदासाचे घर" अशी म्हण आहे.
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
LikeShow more reactions
Comment

Wednesday, October 5, 2016

***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)
मागील भागात सांगितल्याप्रमाणे या रचनेचा अभ्यास, या रचनेचे चिंतन लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्हीही अंगांनी करता येते. पण चिंतनाचा गाभा हा दासांची भावावस्था हा आहे. त्याला केंद्रस्थानी धरून आपण या रचनेचे निरूपण बघत आहोत. कनक म्हणजे सोन्याची वृष्टि करत ये, प्रपंचात जी लक्ष्मीची कृपा लागते ती असावीच इत्यादि सर्व हे दासांना मान्य आहेच आणि या रचनेतून दास ते प्रकटसुद्धा करतात. प्रापंचिकांना जे हवे आणि पारमार्थिकांना जे हवे ते दे हा भाव दासांचा आहेच. दासांचं मागणं माझ्या स्वतःसाठी तू सोन्याची वृष्टी करत ये हे नाही, हे लक्षात घ्यावे. इथे वैयक्तिक दास आणि त्यांचा भाव लक्षात घेऊन थोडया वेगळ्या अनुषंगाने या रचनेचा आपण अर्थ बघत आहोत. या निरूपणा व्यतिरिक्त संपूर्ण रचेनचा शब्दांप्रमाणे जसाच्या तसा अर्थ शेवटच्या भागात देत आहे. पुढील पदात दास म्हणतात,
अत्तितगलदे भक्तर मनेयोळु । नित्य महोत्सव नित्य सुमंगल ॥
"अत्तितगलदे" म्हणजे सैरावरा न पळता. इकडे-तिकडे न जाता. चंचलता हा लक्ष्मीचा गुण आहे. एका जागी ती स्थिर नसते. म्हणून दास तिला विनवणी करतात की, इकडे तिकडे जाऊ नकोस, एका जागी स्थिर राहा. "भक्तर" म्हणजे भक्तांच्या, "मनेयोळु" म्हणजे घरामध्ये. भक्तांच्या घरांमध्ये तू स्थिर राहा. कारण तू जेव्हा स्थिर राहतेस तेव्हा त्या घरांमध्ये नित्य महोत्सव नित्य सुमंगल ॥ सदैव महोत्सव चालतात, तेथे नित्य,सदैव सुमंगलच घडते.
दासांनी भगवंतालाच घट्ट धरून ठेवले आहे. वैयक्तिक दासांसाठी भगवंत त्यांच्याबरोबर असल्याने लक्ष्मीसुद्धा त्यांच्याकडे नित्य आहेच. या पदातून ते सर्वांसाठी मागणं मागत आहेत की तू भक्तांच्या घरांमध्ये स्थिर राहा जेणेकरून तेथे नित्य सुमंगलच घडेल. घरादारावर तुळशीपत्र ठेवल्यानंतर व्यासतीर्थांकडे जाऊन दासांनी हरिदास दीक्षा घेतली तो कथाभाग आपण पाहूया. त्यातून दासांची वृत्ती कशी पालटली हे कळते आणि रचनेत ते स्वतःसाठी नक्कीच काही मागणं मागत नाहीत हे कळते.
हंपीला व्यासतीर्थ गुरूंकडे जात असताना वाटेत अरण्यात सरस्वतीबाईंना भिती वाटू लागली आणि त्यांनी तसे नायकांना सांगितले. "सर्वस्व त्याग करून निघालो असताना भिती कशाची?" असे नायक म्हणाले. नायकांनी "बरोबरचे गाठोडे पाहू", म्हणून सरस्वतीबाईंना ते सोडायला लावले. "त्यात काही नाही. पाणी पिण्याकरीता फक्त एक सोन्याचे फुलपात्र आहे." असे सरस्वतीबाई म्हणाल्या. "हे पहा, या सोन्याच्या पात्रामुळेच तुला भय वाटत आहे." असे म्हणून नायकांनी ते पात्र अरण्यात भिरकावून दिले. आता "भिण्याचे कारण नाही, भगवंत आपल्याबरोबर आहे, आपण गुरूंकडे जात आहोत, काळजी नसावी" असा धीर दिला आणि पुढची वाट चालू लागले.
चक्रतीर्थ हंपी येथे येताच तेथील सर्व परिसराचे दर्शन घेत घेत व्यासतीर्थांपर्यंत येऊन नायक थांबले. व्यासतीर्थ तेव्हा शिष्यांना पाठ सांगत बसले होते. नायकाने त्यांना नमस्कार केला. हात जोडून गुरूंसमोर नायक उभे राहिले. त्यांना बघताच स्वामी म्हणाले, "यावे नायक. मी तुमचीच वाट पाहात होतो. चालत आलात का? काही अडचण तर आली नाही ना? श्री नारायणानेच तुमची परीक्षा घेतलेली आहे. पाठ संपतच आहे. एवढ्यात पुजा नैवेद्य होईल. तीर्थ प्रसादानंतर आपण बोलूया."
नायकांनी स्वामींचे हे सर्व बोलणे ऐकून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तीर्थ प्रसादानंतर स्वामींनी नायकाला गुरूपदेश केला. मंत्रोपदेश दिला. भागवत धर्माची दीक्षा दिली. त्या दिवसापासून नायक हरिदास झाले. "पुरंदर विठ्ठल" या नाममुद्रेने भगवंताची पदे रचून सेवा करावी आणि भगवंताचे माहात्म्य जनास सांगावे अशी आज्ञा व्यासतीर्थांनी केली. गुरूंच्या पूर्णकृपेनंतर पहिलेच पद त्यांनी रचले ते म्हणजे "कृष्णमूर्ती कण्ण मुंदे निंतिद्दतिदे." म्हणजे श्रीकृष्णच माझ्या डोळ्यांपुढे उभा आहे.
असे हे पुरंदरदास रोज स्नान आन्हिक आटोपून, तंबोरा वाजवत भगवंताचे भजन करीत करीत ग्रामप्रदक्षिणा करत. त्यांची चारही मुले त्यांच्या समवेत मृदुंग टाळ वाजवीत असत. त्यांनी पदे गायला सुरूवात केली प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्यापुढे नाचत असे. नगरातील लोकांच्या घरातून जे काही झोळीत मिळेल त्यावरच संतुष्ट होऊन आपली दिनचर्या ते चालवत असत. उद्याकरीता म्हणून काही संग्रह करायची त्यांची वृत्ती राहिली नव्हती. आपल्याला अन्न मिळाले तर त्यातील राहिलेले अन्न भुकेलेल्यांना, जनावरांना देणे किंवा चक्रतीर्थातील जलचरांना ते देत, पण संग्रह काहीच करून ठेवत नसत. या त्यांच्या वृत्तीप्रमाणे वागणाऱ्या घरांना कर्नाटकात "अरे, याच्याकडे नसेल काही संग्रही, हे तर पुरंदरदासाचे घर" अशी म्हण आहे.
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
LikeShow more reactions
Comment
BHAUSAHEB MAHARAJ
***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ३)
पाऊलावर पाऊल टाकत, पायातील पैंजणांचा आवाज करत ये, असे दासांनी बोलवल्यावर लक्ष्मी येते आणि त्याचा परिणाम काय होतो हे दास पुढील ओळीत सांगत आहेत.
तुझ्या येण्याने जीवांना शुद्ध भक्ती प्राप्त होते, जी यथार्थ ज्ञानाला कारणीभूत आहे. भगवंताला जाणायचे झाल्यास ज्यांनी त्याला जाणले आहे, ज्या मार्गाने जाणले आहे त्यामार्गाने आणि त्यांचा हात धरून जाणे हिताचे आणि तू तर अशा भगवंताबरोबर नित्य असतेस. तुझी कृपा झाली तर त्या सत्य,ज्ञानानंदादि गुणपरिपूर्ण भगवंताला जाणता येईल. आणि तुझ्या आगमनाने तेच साध्य होते.
तू आल्याची खूण काय आहे आई आणि ती कशी ओळखावी, यासाठी दास म्हणतात, सज्जन साधु पूजेय वेळगे । मज्जिगेयोळगिन बेण्णेयंते ॥ तू आल्याची खूण सज्जनांमध्ये, साधूंमध्ये दिसते. जे खरोखर सज्जन, साधू या पदास बाह्य स्थितीने नाही तर अंतरंग स्थितीने पोहोचले आहेत, ते त्या स्थितीला कशामुळे पोहोचले? तर ते जेव्हा तुझी पूजा करतात, तुझी आराधना करतात तेव्हा "मज्जिगेयोळगिन बेण्णेयंते" म्हणजे ताक घुसळल्यावर जसे त्यातून लोणी वर येते तसेच तुझ्या येण्याने साधू सज्जनांच्या अंतरंगात मंथन चालते आणि त्यातून भक्तीरूपी लोणी बाहेर येते आणि त्या शुद्धभक्तीमुळेच ते भगवंताला जाणतात. अशी कृपा तू करावीस म्हणून हे भाग्यप्रदान करणाऱ्या आई तू ये.
रचनेतील पुढील पद उद्याच्या भागात जाणून घेऊया. त्याआधी पुरंदरदासांची स्वतः भगवंताने येऊन घेतलेली परीक्षा, तो प्रसंग आपण पाहणार आहोत. भगवंतानेही व्यवहारातल्या लक्ष्मीचा म्हणजे एका दागिन्याचा आधार घेत दासांमधून भक्तीरूपी, ज्ञानरूपी लोणी बाहेर काढले जे आज शेकडो वर्षे त्यांच्या साहित्यातून, रचनांमधून आपणास चाखयला मिळते.
पुरंदरदासांचा जन्म महाराष्ट्रातील पुरंदर गडावर १४८० साली झाला. त्यानंतर ते हंपि येथे स्थायिक झाले. ते नवकोट नारायण होते. त्यांचे आधीचे नाव श्रीनिवास नायक होते. सावकारी होती. कशालाही कमी नव्हती. पैसा म्हणजेच सर्वकाही आणि त्यासाठीच जगायचे एवढा एकच विचार श्रीनिवास नायक करायचे. त्यामुळे सहाजिकच वृत्ती कंजूष आणि क्रूर अशी होती. त्यांची पत्नी सरस्वतीबाई या मात्र अतिशय शांत आणि प्रेमळ स्वाभावाच्या होत्या. या त्यांच्या दास होण्यास कारणीभूत ठरल्या आणि त्याबद्दल नंतर त्यांनी एका पदात तिचे आभार मानले.
आता या श्रीनिवास नायकाला दणका देण्यासाठी आणि त्याचे जीवनातील खरे कार्य त्याला समजण्यासाठी भगवंताने एके दिवशी एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि श्रीनिवास नायकाकडे आला. "मला माझ्या मुलाचे उपनयन करायचे आहे, तेव्हा आपण मला थोड्या पैशाची मदत करा" असे त्याने नायकाला सांगितले. नायक म्हणाला, "तारण आणले आहे का तरच पैसे मिळतील." त्या ब्राह्मणाची दया येऊन पैसे देण्याची वृत्ती श्रीनिवास नायकाची नव्हती. पण तीच वृत्ती पालटवण्यासाठी या विश्वाचा नायक साक्षात श्रीनिवास त्याच्यापुढे आला होता. त्या ब्राह्मणाने रोज येऊन पैसे मागावेत आणि श्रीनिवास नायकाने त्यास नकार द्यावा असे सहा महिने चालले. शेवटी त्या ब्राह्मणापासून सुटका मिळवण्यासाठी श्रीनिवास नायकाने त्याला एक फुटका रूपया दिला ज्याला काहीही किंमत नव्हती. तो ब्राह्मण निघून गेला.
दुसऱ्या दिवशी त्या ब्राह्मणाने श्रीनिवास नायकाची पत्नी सरस्वतीबाई हिला गाठले. त्या अतिशय दयाळू होत्या. त्याने त्या बाईंना आपल्याला मदत करायला सांगितली. पण त्यांना आपल्या पतीचा स्वभाव माहिती होता. त्यामुळे त्यांच्या परवानगी शिवाय मी तुम्हाला कुठलीच वस्तू देऊ शकत नाही. पण ही माझ्या आईवडीलांनी दिलेली नथ आहे, ती घ्या. असे म्हणून सरस्वतीबाईंनी त्या ब्राह्मणाला नथ दिली.
तो ब्राह्मण लगेचच श्रीनिवास नायकांकडे आला. त्याला पाहूनच नायक खवळले. पण तो ब्राह्मण म्हणाला, "मी इथे भीक मागायला आलेलो नाही तारण ठेवायला आणले आहे, मला पैसे द्या." नायक शांत झाला म्हणाला, "दाखवा काय आणले आहे तारण म्हणून?" त्याने ती नथ काढून नायकाला दाखवली. ती पाहिल्या बरोबरच नायकाने ती ही आपल्या बायकोची आहे हे ओळखले आणि त्या ब्राह्मणाला ही तुला कुठे मिळाली असे विचारले. त्यावर त्याने मला ही बक्षीस म्हणून मिळाली आहे असे सांगितले. श्रीनिवास नायकाने त्याला उद्या येण्यास सांगितले. ब्राह्मण गेल्यावर ती नथ त्याने एका पेटीत कड्या कुलपांनी बंद करून ठेवली आणि घरी गेला.
घरी आल्यावर आपल्या पत्नीच्या नाकात नथ न पाहिल्याने नायकाने विचारले की नथ कुठे आहे? त्यांनी कशीतरी वेळ मारून नेली, पण नायक आपल्या पत्नीच्या उत्तराने समाधानी नव्हता आणि तो चिडला होता. त्याने नथ आणून दे असे सांगितले आणि निघून गेला. सरस्वतीबाईंना खूप अपराधी वाटू लागले. आपला पती आता आपल्याला शिक्षा करणार या भितीने त्यांनी आता विष घेऊन मरावे हा पर्याय निवडला. सरस्वतीबाईंनी एका भाड्यांत विष घेतले आणि भगवंताचे नामस्मरण केले आणि ते पीणार इतक्यात त्या भांड्यात नथ येऊन पडली.
सरस्वतीबाईंनी मनोमन भगवंताचे आभार मानले आणि ती नथ धुवून नायकाला आणून दिली. ती नथ पाहून नायक चक्रावला आणि लागलीच सावकारीच्या दफ्तरावर आला. त्याने ती कड्या कुलपांमध्ये बंद केलेली पेटी उघडली आणि बघतो तर त्यातील नथ गायब! हा एक दणका नायकासाठी पुरेसा होता. तो घरी आला त्याने पत्नीला सर्व प्रकार सांगितला. नथ नाही हे कळल्यावर मला तो ब्राह्मण पुन्हा दिसला आणि क्षणार्धात अंतर्धान पावला. तो ब्राह्मण म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात श्रीहरीच होता असे सांगितले.
घरावर, सावकरीवर तुळशीपत्र ठेवले आणि चार मुले, पत्नी यांच्यासह हरिकिर्तन करत करत चालू लागला. त्याच्या गळ्यातल्या सोन्याच्या दागिन्यांची जागा आता तुळशीच्या माळेने घेतली होती. सोन्या, हिऱ्यांमध्ये असणाऱ्या हातात तंबोरा आणि चिपळ्या आल्या होत्या, मुखी हिशेबाच्या आकड्यांऐवजी भगवंताचे नाम आले होते आणि असे श्रीनिवास नायकाचे हरिदास, श्रीपुरंदरदास झाले होते.
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

Saturday, October 1, 2016

***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग २)
या अखिल विश्वाचे स्वामी, अधिपती, सत्य, ज्ञान आणि आनंद अशा सकल गुणांनी परिपूर्ण असणारे भगवान नारायण यांची नित्यावियोगिनी आदि शक्ती श्रीमहालक्ष्मी. भगवंत आणि तिच्यात वियोग कधीच नाही. ती नित्य त्याच्या अनुसंधानात असते. तीच त्याची प्रथम दासी आहे. जगदुत्पत्ति व स्थिति लयादि कार्यात भगवंताबरोबर तीसुद्धा विविध रूपे धारण करते. भगवंताचे खरे दास्य, परिपूर्ण अशी भक्ती कुणाकडून जाणून घ्यायाची असेल तर आई महालक्ष्मीला शरण जायला हवं... भगवंतापासून दूर नेते ती माया, त्या मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत नेण्यासाठीच श्रीपुरंदरदास आई महालक्ष्मीला बोलावत आहेत.
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा । नम्ममा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा ॥
बारो म्हणजे ये ना, अम्मा म्हणजे आई. ये गं आई अशी विनवणी दास करत आहे. भाग्य प्रदान करणारी अशी लक्ष्मी ही अखिल विश्वाची आई आहे. आणि त्या विश्वातील मी एक जीव म्हणजे माझीही तू आई. या भावनेतून तिला दास बोलावत आहे. नम्म म्हणजे माझी. सौभाग्य प्रदान करणारी अशी तू ये आणि आमच्यावर कृपा कर.
येथे दास स्वतःसाठी बोलावत आहेत का? त्यांना वैयक्तिक काहीतरी हवे आहे का? अर्थातच नाही!! संत स्वतःकरीता काही मागतंच नाहीत. नामदेव महाराज म्हणतात तसे "नामा म्हणे मज तुमचे न लगे काही" लोकांचे कल्याण व्हावे इतकाच त्यांचा हेतू असतो. पुरंदरदाससुद्धा त्याच हेतूने आई महालक्ष्मीला बोलावत आहेत.
पुढे दास म्हणतात,
हेज्जेय मेलोंद्‍हेज्जेय निक्कुत । गेज्जेय कालिन नादव तोरूत ॥
पं. भीमसेन जोशींच्या स्वरात आपण ही रचना ऐकली तर त्यात "गेज्जे कालगळा ध्वनीय तोरूत" आधी म्हटले आहे आणि मग "हेज्जेय मेलोंद्‍हेज्जेय निक्कुत" म्हटले आहे. असे का केले आहे याचे कारण संगीतकारालाच माहित! "गेज्जेय कालिन नादव तोरूत" असे आहे. अर्थात त्या ध्वनीफितीत जे म्हटले आहे त्याचा अर्थही तोच होत असला तरी त्यात बदल करण्यासाठी ही कुठल्यातरी कवीची कविता नाही! हे काव्य नाही! हा साक्षात आई लक्ष्मी आणि दासांमधला संवाद आहे. सर्व संतांचे अनुभव हे त्यांच्या पदांमधून, रचनांमधून व्यक्त होत असतात. तेव्हा त्या शब्दांमध्ये संगीताच्या सोयीसाठी बदल करणे शक्यतो टाळावे या मताचा मी आहे! आणि या रचनेत बदल करावा अशी परिस्थिती नाही! अर्थात याची दुसरी बाजू अशीही आहे की, काळानुसार मूळ रचना सापडत नाहीत. बहुतांश वेळा त्या मौखिकरित्या पुढच्या पिढीकडे येत असतात. मग त्यात भाषेप्रमाणे खटकेल तसे बदल केले जाऊ शकतात. या रचनेत वेगवेगळे शब्द म्हणण्यामागे असेच काहीतरी असावे असे वाटते.
हेज्ज म्हणजे पाऊल. मेले किंवा मेलोंद्‍हेज्जेय म्हणजे पाऊलावर पाऊल टाकत. हे दासांचे अनुभव आहेत हा दासांचा देवीशी चाललेला संवाद आहे. यातला कुठलाही शब्द उगीच लिहिलेला नाही. हे त्याचा अर्थ समजून घेतल्यावर कळते. पाऊलावर पाऊल टाकत म्हणजे येथे दासांना नक्की काय म्हणायचे आहे? तुझ्याच पाऊलावर पाऊल टाकत ये असे का?
येथे पाऊलावर पाऊल प्रतिकात्मक दृष्टीने घेतलेले आहे. त्यामागील भाव असा आहे की, आई तुझा तर भगवंतापासून, त्या श्रीहरीपासून कधीही वियोग होत नाही. अवियोगी अशी तू आहेस. त्यामुळे जिथे जिथे श्रीहरीचे पाऊल तिथे तिथे तुझे पाऊल हे उघड आहे! नवाविधाभक्तीत पादसेवन भक्ती कोणाकडून शिकावी तर आई महालक्ष्मीकडून. त्यामुळे जिथे भगवंताची पाऊले तिथे लक्ष्मीची वस्ती असतेच. पण आम्हाला श्रीहरी कुठे हवा आहे? आम्हाला भगवंत नको! आम्हाला फक्त लक्ष्मी हवी आहे! पण ती भगवंताच्या आधीन आहे. म्हणून तू काय कर? तर दास म्हणतात गेज्जेय कालिन नादव तोरूत ॥ किंवा गेज्जेय कालिन/कालगळा ध्वनिय माडुत ॥ असा पाठभेद सुद्धा आहे. अजून अनेक वेगवगेळ्याप्रकारे ऐकायला मिळते पण अर्थ तोच आहे.
त्याचा अर्थ असा आहे, तू तुझ्या पावलातील पैंजणांचा आवाज करत ये! त्याने काय होईल? माया हे तुझेच एक रूप आहे. पण या तुझ्या मायारूपाचा म्हणजे मायेचा लवलेशही ज्याला लागत नाही, नव्हे त्याने तो ग्रासणे हे शक्यच नाही असा भगवंत तुझा पती आहे, मायापती आहे. तुझा प्रभाव काही जीवांवर इतका पडतो की तो भगवंतापासून दूर जातो. त्याला भगवंत नको असतो. आणि हे व्यवहारातंही आपल्याला दिसेल बघा, लक्ष्मीपूजन जितक्या शांततेत, मनापासून केले जाते, तितके सत्यनारायण पूजन होत नाही बघा! पण तू कशी आहेस हे संतांनी बरोबर ओळखले आहे. म्हणून तू काय कर, या मायारूपी निद्रेत असलेल्या जीवांना तुझ्या पैंजणांचा आवाज करून जागं कर. म्हणजे ज्ञान प्रदान कर! कारण मा म्हणजे ज्ञान आणि या म्हणजे प्रदान करणे त्यामुळे भगवंतापासून दूर नेणारीही तूच आणि त्याच्या जवळ नेणारीही तूच आहेस आई! तेव्हा तुझ्या पैंजणांच्या आवाजाने त्यांना जाग आली की त्यांना कळेल की तुझे पाऊल त्या श्रीहरीच्या पाऊलावर आहे तो आधी येतो मग तू येतेस. हे ज्ञान त्यांना होईल. त्यासाठी तू तुझ्या पायातील पैंजणांचा आवाज करत ये!
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १)
श्रीमन्मध्वाचार्यांनी रचलेल्या कर्नाटक संगीताच्या पायावर दासपरंपरेने कळस चढवला. त्यातले दासश्रेष्ठ, दास परंपरेतील, एकप्रकारे हरिदासांच्या चळवळीतील प्रमुख दास म्हणजे संत श्रीपुरंदरदास. भगवंताने ज्या कार्यासाठी पाठवलंय ते कार्य तो कसे पूर्ण करून घेतो याचे एक उदाहरण म्हणजे दासांचं चरित्र आहे.
हरिदास बनण्याआधी अतिशय धनाढ्य, पैशाचीच रात्रंदिवस चिंता असणाऱ्या, त्याचाच विचार करणाऱ्या, दासांची भगवंत एका प्रसंगातून परीक्षा घेतो आणि दास वर्षानुवर्षे जपत आलेल्या सावकारीवर, घर-दारावर दास तुळशीपत्र ठेवतात आणि गुरूशोधार्थ निघतात. यात त्यांची पत्नीही त्यांना साथ देते.
"विजयनगरात हंपी येथे श्री व्यासराजतीर्थांकडे जा आणि हरिदास हो" असे स्वप्नात भगवंताने येऊन सांगितल्यावर दास हंपी येथे आले. स्वामींनी त्यांना गुरूपदेश केला आणि हरिदास दीक्षा दिली.
अतिकर्मठ, प्रकांडपंडित असून अहंभाव असणाऱ्या, वेदांत हा फक्त आपल्यासाठीच, अशी चुकीची समजूत झालेल्या मंडळींकडील तत्त्वज्ञान सकल जनमानसासाठी खुले करून देणे हाच या दास चळवळीचा उद्देश. आणि या दासपरंपरेने केवळ कर्नाटकच नाही तर जवळ जवळ भारतभर त्यांच्या कार्याचा प्रसार केला. हाती वीणा आणि चिपळ्या, अंगी चंदनाचे टिळे आणि भगवंताचा महिमा, स्तुती, त्याचे कारूण्य, त्याचे स्वरूप आणि तत्त्वज्ञान या सगळ्यावर रचना करत करत गावोगाव संचार करणे हे दासकूटाचे कार्य. (कूट म्हणजे समूह) तत्त्वज्ञान कोणतेही असो त्याचा आधार घेऊन सत्य अनुभवता येते. दासपरंपरेने केवळ संस्कृतमधील तत्त्वज्ञान सोप्या व प्रांतांच्या भाषेप्रमाणे मांडले नाही तर स्वतः तत्त्वज्ञानाच्या आधारे सत्य अनुभवले, परब्रह्म नारायणाला ओळखले आणि मग त्याला ओळखण्याचा मार्ग, त्याचे स्वरूप, साधनेतील अनुभव हे सर्व आपल्या रचनांमधून मांडले. कर्नाटकातील दास परंपरा आणि महाराष्ट्रातील वारकरी परंपरा या परस्पर पूरक चालत आल्या आहेत. साधारण इसवी सन १२०० ते १८०० हा काळ कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या भूमीने भक्ती,विठ्ठल आणि संगीत हे एकत्र अनुभवलं. विद्वानांनी विभाजन केलेला समाज एकत्र करण्याचे खूप मोठे कार्य दास आणि वारकरी परंपरेने केले आहे.
या दासकूटाने त्यांच्या पदांमधून, रचनांमधून कर्नाटकातून महाराष्ट्रात गेलेला पांडुरंग जणू काही कर्नाटकात परत आणला. त्यांच्या रचना, अभंग हेच त्या परब्रह्म पांडुरंगाचे मूर्त रूप झाले. त्यामुळे तो कर्नाटकु विठ्ठलु मूर्त पाषाणरूपाने महाराष्ट्रात असला तरी दास साहित्यरूपी विठ्ठल कर्नाटकातच होता, आहे आणि असेल. असं सामर्थ्य ज्यांच्या पदांमध्ये आहे असे दासपरंपरेतील दासश्रेष्ठ म्हणजे संत श्रीपुरंदरदास. यांच्या ४,७५,००० रचनांपैकी एक रचना आपण या जगन्मातेच्या या नवरात्रोत्सवात जाणून घेणार आहोत.
खरंतर ही रचना, हा अभंग महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात अमुक एक अभंग कुणी रचला हे हे जसे माहित असते तसे कानडीत असल्यामुळे सहाजिकच या रचनेचे नाही. पण ही रचना कुणाची आहे यावरून नाही तर ती कुणी गायलेय यावरून लोकप्रिय झाली आहे. त्यात गैर काहीच नाही. पं. भीमसेन जोशींचा स्वर, गाण्याची स्वर रचना यावरून ते अधिक लोकप्रिय ठरले आहे. आणि त्याचा अर्थ हा सहज उपलब्ध होईल असा नसल्याने किंवा त्याचा अर्थ जाणून घ्यायची इच्छा नसल्याने कदाचित ही रचना गायक आणि संगीत इथपर्यंतच मर्यादित राहिली असावी. पण म्हणूनच आज अश्विन शु. प्रतिपदेपासून अश्विन शु. दशमी पर्यंत आपण "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा" या रचनेचे निरूपण बघणार आहोत. या रचनेच्या स्वर,संगीताबरोबरच पुरंदरदासांचं श्रेष्ठत्वही या रचनेचा अर्थ जाणून घेतल्यावर कळेल आणि या रचनेचा अर्थ कळल्यावर जेव्हा ही रचना आपण पंडितजींच्या स्वरात ऐकाल तेव्हा स्वरांमध्ये जितके रममाण होता तितकेच आई लक्ष्मीच्या अनुसंधानात राहाल अशी खात्री आहे.
प्रथम मूळ रचना पूर्ण देत आहे आणि नंतर एक एक दिवस आपण त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत.
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा । नम्ममा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा ॥
हेज्जेय मेलोंद्‍हेज्जेय निक्कुत । गेज्जेय कालिन नादव तोरूत ॥
सज्जन साधु पूजेय वेळगे । मज्जिगेयोळगिन बेण्णेयंते ॥ १ ॥
कनक वृष्टिय करेयुत बारे । मन कामनेय सिद्धिय तोरे ॥
दिनकर कोटि तेजदि होळेयुव । जनकरायन कुमारि बेगा ॥ २ ॥
अत्तितगलदे भक्तर मनेयोळु । नित्य महोत्सव नित्य सुमंगल ॥
सत्यव तोरूत साधु सज्जनर । चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥ ३ ॥
संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु । कंकण कैय तिरूवुत बारे ॥
कुंकुमांकिते पंकज लोचने । वेंकटरमणन बिंकद राणि ॥ ४ ॥
सक्करे तुप्पद कालुवे हारिसि । शुक्रवारद पूजेय वेळेगे ॥
अक्करेयुळ्ळ अळगिरिरंगन । चोक्क पुरंदर विठ्ठलन राणि ॥ ५ ॥
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
LikeShow more reactions
Comment