Thursday, September 15, 2016

"जय मंगलम नित्य शुभ मंगलम" (भाग ४)
मागील तीन दिवस आपण व्यासराजस्वामींनी मध्वाचार्यांवर लिहीलेले मंगलम पाहत आहोत त्याचा आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी समारोपाचा भाग पाहणार आहोत.
वायुदेवांचे तीनही अवतार विलक्षण आहेत. पहिल्या अवतारात हनुमंत असताना ब्रह्मचर्य आणि पौरूष. दुसऱ्या भीमसेन अवतारात पौरूष आणि गृहस्थ आणि मध्वाचार्य असताना ब्रह्मचर्य, संन्यास, शुद्ध वेदांत. तीनही अवतारात वेगवेगळे कार्य करून दाखवले. पण असे असतानाच शक्ती, युक्ती, भक्ती या तीन गुणांचे मिश्रण तीनही अवतारात सारखेच पहावयास मिळते.
श्रीमदाचार्यांच्या चरित्रातून शिकण्यासारखे पुष्कळ आहे. मत-मतांतरे, गैरसमज, चुकीच्या समजुती यामुळेच आचार्यांचे चरित्र भारतीय जनमानसात शुद्ध, योग्य रितीने पोहोचू शकले नाही. आणि हे आपलेच दुर्भाग्य म्हणावे लागेल. परदेशामधील व्यक्तींना जी आस्था त्याहीपेक्षा जिज्ञासा आचार्यांबद्दल वाटते ती, आचार्यांनी शक्ती, युक्ती आणि भक्ती प्रसारासाठी ज्या भारत भूमीवर दोनदा भ्रमण केले त्या भूमीतील लोकांमध्येच आज नाही.
मध्वाचार्यांनी केवळ हिंदु धर्मातील तत्त्वज्ञान समजून घेऊन, अनुभवून त्याचा प्रसार केला नाही तर इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचाही त्यांचा अभ्यास होता आणि त्यानंतर त्यांनी आपल्या धर्मातील तत्त्वज्ञान सांगितले. आणि तेच या शेवटच्या कडव्यात सांगितले आहे.
व्यासराजस्वामी म्हणतात,
इळीयोळु दुर्मतवा
अळीदु व्यासरपाद
नरलक्येरगी बदरेयल्ली
मोदित इरुववगे || ४ ||
म्हणजे येथील दुर्मतांचा, ज्याने कल्याण होणार नाही अशा मतांचे वेदव्यासांच्या सांगण्यावरून खंडन करून अनुभवलेले सत्य आपल्या ग्रंथामधून मांडले आणि ते वेदव्यासांच्या चरणी अर्पण केले आणि बद्री येथे अदृश्य झाले.
इथे व्यासरपाद म्हणताना व्यासराजस्वामींनी त्यांची नाममुद्रा सुरेखरित्या घेतली आहे. असे श्रीमन्मध्वाचार्यही आमचे मंगल करोत असे शेवटी म्हणत हे मंगलम समाप्त होते.
आज गणेशोत्सवाची सांगता. या उत्सवात त्याने जी काही सेवा आपल्यालाकडून करून घेतली ती त्याच्या चरणी अर्पण आणि सद्गुरूंवरील हे मंगलम आपण पाहिले त्यामागील भाव हा आपापल्या इष्ट देवता आणि गुरूंबद्दल जागृत व्हावा आणि आपले कल्याण साधले जावे इतकीच गजानना चरणी प्रार्थना.
गणेशोत्सवानंतर, नवरात्रात पुरंदरदासांच्या "भाग्यदा लक्ष्मी बारम्मा" या अभंगावरील निरूपण आपण पाहणार आहोत.
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
"जय मंगलम नित्य शुभ मंगलम" (भाग ३)
वायुदेवाच्या तीन अवतारांचे वर्णन करताना पहिले कडवे प्रभु रामचंद्रांना प्रिय असणाऱ्या हनुमंत आमचे मंगल करोत, असे म्हणून द्वितीय अवातार असणारे भीमसेन यांचे वर्णन दुसऱ्या कडव्यात करतात.
पडवीयोळ कुंती या 
वडलजातनु तन्न
मडदीय बचसीद किचक नन्नु
तडेयदे कवंदवगे || ३ ||
पडवी म्हणजे येथे भूमी असा अर्थ आहे. वायुदेव कुंतीचा पुत्र भीमसेन म्हणून भूमीवर आले. ज्यांनी किचकाच वध केला. किचक हा मत्स्य देशीच्या राजा विराटाचा सेनानायक होता. तो द्रौपदीच्या सोंदर्याला भाळला होता. त्याच्यापासून सुटका द्रौपदीची सुटका करण्यासाठी भीमसेनांनी किचकाचा वध केला. असे भीमसेन आमचे मंगल करोत.
द्रौपदीमध्ये पाच देवतांच्या पत्नीचे अंश होते. त्यातील एक म्हणजे भारतीदेवी. म्हणून तिला पाच पती होते. कारण त्या पाच पांडवांमध्येही पाच देवतांचे अंश होते. जसे भीमसेनांमध्ये वायु आणि द्रौपदीमध्ये भारती देवी.
महाभारतात आणि इतर पुराणातही याचा उल्लेख येतो. यमाचा अंश धर्मराजामध्ये म्हणून यमाची पत्नी श्यामला तिचा अंश, इंद्राचा अंश अर्जुनामध्ये म्हणून त्याची पत्नी शची तिचा अंश, अश्निनीकुमार या देवतांचे अंश नकुल आणि सहदेवांमध्ये पण त्यांना पत्नी एकच उषा तिचा अंश, आणि पार्वती देवीचा अंशही द्रौपदीमध्ये होता असे भगवान वेदव्यासांनी महाभारतात उल्लेख करून ठेवले आहे. यावर खूप विश्लेषण करता येण्यासारखे आहे पण येथे तो प्रतिपद्य मुद्दा नाही.
भारती आणि सरस्वती यांचे कार्य एकच आहे. तो भारतीस समानर्थी शब्द सुद्धा आहे. जरी ब्रह्मदेवांची सरस्वती, वायुदेवाची भारती, गरूड देवाची सौपर्णी, शेषदेवाची वारूणी, रूद्र देवांची पार्वती, अशा क्रमाक्रमाने त्या त्या देवतांची सहचारिणी शास्त्रात उल्लेखलेली आहे तरी सुद्धा भारती, सरस्वती ज्ञान प्रदान करणाऱ्या आहेत. भारतीला स्वस्ति असेही म्हणतात.
आता तिचे कार्य कोणते? शब्द म्हणजे एकाप्रकारे वायु किंवा हवाच. जोपर्यंत त्या शब्दाचे,अक्षराचे ज्ञान होत नाही तोपर्यंत केवळ ओठ हालत असतात ज्यातून हा वायू खेळत असतो. तेव्हा हे भारतीदेवीचे कार्य असते की, त्याचे ज्ञान आपल्याला होईल. मनात आलेले विचार शब्दांमध्ये मांडता येणं यासाठी भारतीदेवीची कृपा असावी लागते. मूक असणाऱ्याला जिची कृपा लाभल्यावर बोलता येते, जडबुद्धी, अज्ञानी असणाऱ्याला जिच्यामुळे ज्ञान प्राप्त होते अशी भारतीदेवी माझ्या वाचेमध्ये तुझे सन्निधान नित्य राहो.
अशा भारतीदेवीचा अंश द्रौपदीमध्ये होता आणि तिच्यासाठी, वायुदेवाचे अवतार असलेल्या भीमसेनांनी किचकास मारले याबद्दल व्यासराजस्वामींनी या दुसऱ्या कडव्यात सांगितलेले आहे.
शेवटी मध्वाचार्यंबद्दल सांगून या मंगलमचा शेवट होतो. ते पुढील भागात जाणून घेऊ.
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
"जय मंगलम नित्य शुभ मंगलम" (भाग २)
श्री व्यासराज स्वामींनी श्रीमन्मध्वाचार्यांवरील रचलेले मंगलम आपण आज पाहणार आहोत. मागील भागात सांगितल्याप्रमाणे वायुदेवाच्या अवतारत्रयीचे वर्णन यातून श्रीव्यासराज स्वामींनी केले आहे.
मंगल भारती ध्वरीगे 
मंगल राघव प्रियगे
मंगल श्री कृष्णन भकुतगे
मंगल गुरूवरीगे || ध्रु .||
जयदेव जयदेव या पदाप्रमाणेच येथे "मंगल" किंवा "मंगलम" असे पद वापरले आहे. त्याचा अर्थही तसाच घेणे अपेक्षित आहे. "भारती ध्वरीगे" म्हणजे भारती देवीचा पती. म्हणजेच वायुदेव किंवा मुख्यप्राण. सांप्रदायात भारतीरमण मुख्यप्राण असे म्हटले जाते. मुख्यप्राणाला अनन्य महत्त्व आहे. संर्व जीवांच्या अंतार्यामी जी प्राणशक्ती आहे त्या शक्तीचा जो मूळ स्रोत आहे ते तत्त्व म्हणजे मुख्यप्राण. भारती देवीविषयी विस्तृतपणे आपण भीमसेन अवताराच्या कडव्यात जाणून घेणार आहोत.
तर अशा भारतीच्या पतीचा रमणाचा जय असो. "राघव प्रियगे" म्हणजे प्रभु रामचंद्रांना प्रिय असणारे असे हनुमान त्यांचा जय असो.
पुढे म्हणतात "श्रीकृष्णन भकुतगे" भकुत म्हणजे भक्त. श्रीकृष्णप्रभूंचा भक्त असणाऱ्या भीमसेनांना मंगल. आणि शेवटी तिसरा अवतार श्री मध्वराज, आनंदतीर्थ, पूर्णप्रज्ञ अशी नावे असणाऱ्या श्री आचार्यांचा जय असो "मंगल गुरूवरीगे."
मागील भागात मंगल हे विशेषकरून क्षमेसाठी म्हणतात त्यामुळे कुठल्याही मंगलममधून आम्हाला ती इष्टदेवता गुरू आम्हाला मंगल ठरोत आमचे मंगल होवो अमंगल असे काहीही घडू नये असाही भाव मंगलम म्हणण्यामागे असतो.
शरधीयोळ लंघीसि
दुरूळ रावण न्यदीगे
बरदिंद गुद्दिद वानर नायक
अंजनी बालकगे ||१||
प्रत्येक शब्दाचे विस्तृत विवेचन न देता संपूर्ण कडव्याचे सार देत आहे. येथे शरधी किंवा जलधी असा पाठभेद आहे पण दोन्हींचा अर्थ एकच आहे. शरधी किंवा जलधि म्हणजे समुद्र. लंघीसि म्हणजे जो सागर ओलांडून गेला, जो रावणाच्या दरबारात गेला आणि त्याने तिथे असीम असा पराक्रम केला अशा वानर नायकाला, अंजनीच्या बालकाला, पुत्राला मंगल. त्यांचा जय असो.
लेखक : वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी : ९७६२७४४४०७
"जय मंगलम नित्य शुभ मंगलम" (भाग १)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. तसे व्रत एकाच दिवसाचे पण उत्सव हा प्रत्येकजण आपापल्या सोयीने साजरा करत असतो. काळ बदलला आणि त्याबरोबर उत्सवाचे रूप बदलले इतकच नाही तर त्या गणपती देवतेचे मूर्तरूपसुद्धा बदलले. सैराट,बाजीराव मस्तानी, आणि अगदी संघवेशातील गणपतीही यावर्षी पाहायला मिळाला चूक का बरोबर या वादात जाणे उचित नाही. ते प्रत्येकानेच ठरवावे. शेवटी ते तत्त्व आणि आपली त्याप्रती असलेली भक्ती महत्त्वाची.
तर अशाच गणेशोत्सवात गणपती, मोदक याबरोबर येणारी तिसरी सर्वांना प्रिय अशी असणारी म्हणजे आरती. आर्त या धातूतून हा शब्द तयार होतो. त्यातच त्याचा अर्थ आहे. आर्ततेने म्हटले जाणारे देवाविषयीचे, गुरूंविषयीचे स्तवन. साधारणतः ते म्हणत असताना आपले त्यानंतर मिळणाऱ्या प्रसादाकडे लक्ष असते पण मुख्यतः आरती म्हणताना आर्तता, भगवंताशी सद्गुरूंशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न त्यात असावा हा त्यामागील हेतू आहे.
महाराष्ट्रात संतांनी आपल्याला आरत्यांचं एकप्रकारे दालनंच खुलं करून दिलं. त्या आपण लहानपणापासून म्हणत असतो, ऐकत आलेलो असतो. महाराष्ट्र सोडून दक्षिणेतसुद्धा आरत्यांची परंपरा आहे त्यावर प्रकाश टाकून श्रीमन्मध्वाचार्यांवरील एका आरतीचा अर्थ समजून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.
जसं आपण "जयदेव जयदेव" म्हणतो, ते पद जसे ध्रुवपदात असते तसे दक्षिणेत "मंगलम" हे पद वापरले जाते. शब्द वेगवेगळे वापरले तरी देवाचा जय असो, त्याची किर्ती, ख्याती सांगण्यासाठी आरती रचलेली असते.
याचे अजून थोडे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, कर्नटक संगीतात गायनाच्या किंवा नृत्याच्या मैफिलीच्या शेवटी मंगलम सादर करण्याची प्रथा आहे. पूर्वी दिवासाच्या कुठल्या प्रहरात कुठले राग गावेत, कोणते स्वर आळवावेत, हे ठरलेले असायचे. त्याशिवाय इतर स्वर गायले गेले तर क्षमा किंवा माफी मागण्यासाठी विशिष्ट रागात जे भगवंताचे स्तवन गायले जायचे त्यास मंगलम म्हणतात. अशी ही प्रथा रूढ झाली. आता तसे प्रहराप्रमाणे स्वरांचे बंधन पाळले जात नसल्यामुळे संपूर्ण सादरीकराणाच्या अंती सादरीकरणात काही चूक झाली असेल तर क्षमा याचना करण्याच्या हेतूने मंगलम सादर केले जाते. तेही भगवंताचे एकप्रकारे स्तवनच असते. आरतीसुद्धा तशी प्रमुख उपचारांच्या अंतीच केली जाते. त्यानंतर क्षमा प्रार्थनेचा उपचार पूजेत येतो पण तसाच काहीसा भाव मंगलम मध्ये असतो. त्यामुळे असा हा आरती आणि मंगलम यांचा संबंध आपणास आढळून येतो.
कर्नाटक संगीताचा पाय हा श्रीमन्मध्वाचार्यांनी रचला. काव्य,नाटक,संगीत,नृत्य या सगळ्याचे सात्विक रसांनी युक्त असे मिश्रण मध्व सांप्रदायात विशेष करून पहायाला मिळते. त्यामुळे संगीताला विशेष महत्त्व इथे आहे. भगवंताच्या शयन सेवेला गायला जाणारा पाळणा खूप संतांनी रचलेला आहे. जो गात असतान अक्षरशः भगवंताला आपण निजवत आहोत हाच भाव मनात दाटून येतो. ज्याची सुरूवात लाली किंवा जो जो याने होतो. अशा रचनांची संख्या खूप आढळते पण मंगलम म्हणजे आरत्या त्या तुलनेत कमी आहेत. पण उपलब्ध असलेल्या मंगलमपैकी श्रीमन्मध्वाचार्यांचे मंगलम आपण पुढील तीन दिवसात जाणून घेणार आहोत. मुख्यप्राण, वायुदेवाचे तीन अवातार म्हणजे हनुमान, भीमसेन आणि श्रीमन्मध्वाचार्य या अवतारत्रयीचे वर्णन श्रीव्यासराज स्वामींनी या मंगलममधून केले आहे.
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये 



yallagudesh