Sunday, June 26, 2016

देहि मे तव दास्य योगं
महिपती दास : हठयोग-भक्तीयोग संगम
"देहि मे तव दास्य योगं" या मालिकेतून कर्नाटकातील दासपरंपरेशी आपण ओळख करून घेतो. पहिल्या पुष्पात आपण श्रीपुरंदरदासांचे चरित्र पाहिले. आता दुसऱ्या पुष्पात आपण श्री महिपती दासांचे चरित्र जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील ताहाराबादचे महितपती महाराज आणि हे महिपती दास यांचा एकमेकांशी संबंध जोडला जातो पण दोनही सत्पुरूष वेगवेगळया कालखंडात होऊन गेले.
महाराष्ट्रात जशी वारकरी संत परंपरा आहे तशी दक्षिणेत दास परंपरा आहे. दोन्हीही परंपरांमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक असेलही, पण विठ्ठलभक्ती आणि संगीत या गोष्टी सारख्याच आहेत. ही सर्वच्या सर्व दास परंपरा मध्व सांप्रदायावर आधारलेली आहे. आणि इतकच नव्हे तर कर्नाटक संगीताचा उगम हा मध्व सांप्रदायातून झालेला आहे. कर्नाटकातून त्या संगीताचा उगम झालेला आहे, म्हणून त्याला कर्नाटक संगीत म्हणतात हा रूढार्थ झाला, पण ‘कर्ण’ म्हणजे कान आणि ‘अटक’ म्हणजे चांगलं वाटतं ते, कानाला जे चांगलं वाटतं ते "कर्नाटकी संगीत" असा त्याचा खरा अर्थ आहे.
या कर्नाटक संगीताचा उगम हा मध्वाचार्यांपासून होतो. त्यांच्यापुढे त्यांचे शिष्य नरहरी तीर्थ यांनी संगीता बरोबरच नृत्याची जोड देऊन "यक्षगान" हा नवीन नृत्यप्रकार निर्माण केला. त्यापुढे श्रीपादराजतीर्थ, व्यासराजतीर्थ, विजयींद्रतीर्थ, वादिराज तीर्थ आणि राघवेंद्रतीर्थ या सत्पुरूषांनीही कर्नाटक संगीतामध्ये आपले योगदान दिले. व्यासराजतीर्थांचे संगीत शास्त्रावर ग्रंथ आहेत, ज्यात त्यांनी एखादा राग, एखादे पद, कसे गावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. या व्यासराजतीर्थांच्याच काळात म्हणजे १४व्या शतकात दास परंपरा उदयास आली. व्यासतीर्थांनी श्रीपुरंदरदासांना अनुग्रह दिला आणि पंडीतांनी आपल्याच मालकीचे ठरवलेले तत्त्वज्ञान संगीतातून, सुलभ भाषेतून जनमानसापर्यंत पोहोचवण्यास सांगितले. या पुरंदरदासांपासून ही परंपरा सुरू झाली आणि त्यात अनेक महान दास होऊन गेले. त्यातलेच एक म्हणजे "महिपती दास."
काही संत सत्पुरूषांच्या जीवन चरित्रावरूनच, ते कसे होते? याचे ज्ञान आपल्याला होते. महिपती दासांच्या बाबतीत त्यांचे जीवन चरित्र फारसे उपलब्ध नसून सुद्धा त्यांच्या पदांवरून, रचनांवरून ते कसे होते याचे ज्ञान आपल्याला होते. सांप्रदाय, विविध मते या सर्वांचे पाश तोडून परमार्थ कसा करावा, यासाठी महिपती दास हे एक उत्तम मार्गदर्शक आहेत. ध्यान करा, भगवंताला असे पहा वगैरे रचना, अभंग आपण ऐकतो पण महिपती दासांनी, ‘मी काय केलं, ज्यामुळे मला भगवंत दिसला’ हे सर्व अनुभव त्यांच्या रचनांमधून सांगितलेले आहेत. त्यांचे उपलब्ध असणारे चरित्र आणि आपल्या सर्वांना या मार्गात फायदेशीर ठरणाऱ्या त्यांच्या रचनांचा अभ्यास आपण पुढील काही दिवस करणार आहोत.
भगवान श्रीहरीचे भक्त असणाऱ्या कोणेरीराय यांचा मुलगा म्हणजेच नंतरचे महिपती दास. १६११ साली त्यांचा जन्म झाला. उपलब्ध माहिती वरून ‘काठवते’ हे त्यांचे घराणे. ‘कोल्हार प्रह्लाद कृष्णाचार्य’ यांच्याकडून त्यांनी वेदध्ययन पूर्ण केले. संस्कृत, कन्नड, मराठी, हिंदी, उर्दु, पर्शियन या भाषा त्यांना अवगत होत्या. लहानपणीच एका ज्योतिषाने, ‘हा मुलगा राज दरबारी असेल आणि नंतर एक योगी होईल’ असे सांगितले. व्यवहारातले शिक्षणंही महिपती दासांनी घेतले होते. हिशेबात चूक आली तर, "महिपती दासांकडे जाऊया, ते लगेच ती सांगतील आणि दुरूस्त करतील" असे सर्वच गावकऱ्यांच्या तोंडी असे. श्रीमद्‍ भागवत, रामायण यावरील प्रवचने महिपती दास गावकऱ्यांना देत असत. विविध भाषा येत असल्यामुळे इतर धर्मीय देखील ती प्रवचने ऐकायला येत असत.

No comments: