Sunday, June 26, 2016

देहि मे तव दास्य योगं (पुष्प २)
महिपती दास : हठयोग-भक्तीयोग संगम (भाग ३)
भास्कर स्वामींकडून उपदेश घेतल्यानंतर "महिपती" या नाममुद्रेने पद, रचना होऊ लागल्या. महिपती दास स्वतः माध्व सांप्रदायातील होते. शहानंगांनी, भास्कर स्वामी या अद्वैती गुरूंकडे जा असे सांगितल्यावर, ‘ते अद्वैती हे काय माझा उद्धार करणार? मी द्वैती आहे. आमचे तेवढे श्रेष्ठ आहे’ असं म्हणू शकत होते. किंवा भास्करस्वामीही, ‘तुम्ही द्वैती, तुम्ही कायम पायरीवर राहता त्यावर आमचे अद्वैत आहे. तुम्ही माध्व, तुम्हाला मी शिष्य करून घेणार नाही’ असे म्हणू शकत होते. पण असे काहीच घडले नाही किंवा कुणाच्या मनात देखील तसे आले नाही.
कारण इथे जीव योग्यता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याची जशी योग्यता तसा त्याचा प्रवास. डॉक्टर लोक सुद्धा सारख्या रोगाला सगळ्यांना सारखे औषध देत नाहीत. ज्याची जशी प्रकृती तसे त्याचे औषध. असेच इथे आहे. आणि हे नाकारले तरी उघड, दिसणारे असे सत्य आहे. विविधता, भेद ज्याअर्थी आहे त्याअर्थी तो भगवंताच्याच इच्छेने आहे आणि त्याच्या इच्छेने जे चालते ते सत्यच आहे.
भास्कर स्वामी अवधूत होते. साक्षात्कारी महापुरूष होते. त्यामुळे सर्वांकडे बघायची त्यांची दृष्टी विशालच होती, पण महिपती दासांची योग्यता तेवढी होती त्यामुळे मग ते जन्माने कुणीही असोत किंवा कुठल्याही मताच्या गुरूंकडे जावोत योग्यतेप्रमाणे साक्षात्कार तर होणारच. शाश्वत आनंद मिळणारच.
हे द्वैत-अद्वैत, सांप्रदायिक वाद आपल्या मनात असंख्य वादळे निर्माण करण्या पलिकडे काहीही करत नाहीत. कारण आपण ज्या मार्गाने जायचे ठरवतो त्यावर आपली श्रद्धा नसते. ती असती तर दुसऱ्याने आपल्या मार्गाबद्दल, मताबद्दल काहीही जरी बोलले तर आपल्यावर त्याचा परिणाम व्हायचे कारणच नाही. आणि म्हणूनच महिपती दास एका अभंगात म्हणतात, "भास्करगुरू कृपे ज्ञान लेसागि कोरू उदु उन्मना"
भास्कर गुरूंच्या कृपेने काय झालं? तर या द्वैताद्वैत, वाद-विवाद यामुळे जो उन्मनी भाव आला होता, उन्मनी हा अतिशय योग्य शब्द वापरला दासांनी. म्हणजे या मनातल्या गोंधळा पलिकडे नेऊन आत्मानुभव, त्याचं ज्ञान मला भास्कर गुरूंच्या कृपेमुळे मिळालं.
मन स्तब्ध झाल्यावर जी घडते ती खरी साधना. तोपर्यंत जे चालू असतं ते मन स्तब्ध शांत करण्यासाठी चालू असतं ती साधना नव्हे. म्हणून एक सुरेख इंग्रजी वाक्य आहे, "When self starts to think mind ceases to function." असा आत्मानुभव मला भास्कर गुरूंमुळे मिळाला. आणि हा अनुभव ज्याच्या त्याने घ्यायचा असतो. मनातले विचार हे कधी, हा अनुभव आपल्याला देऊ शकत नाहीत. म्हणून गुरू लागतो. तो हा मनातला गोंधळ घालवतो आणि आपल्याला आत्म्यापर्यंत, माझा देह, माझं नाव, माझा हुद्दा, माझं अमुक-तमुक हे सगळं म्हणजे मी नसून माझ्या आत बसलेल्या खऱ्या "मी" पर्यंत तो नेऊन ठेवतो. त्याचं यथार्थ ज्ञान आपल्याला देतो.
पण यासाठी काय हवं? हेही दास सांगतात, हे खूप महत्त्वाचं.. "नंबी नडेय बेकू ढंबकव बिड बेकू"
म्हणजे या अध्यात्म मार्गात सर्वात महत्त्वाचं काय तर, आपण जे करतो त्यावर आपला विश्वास हवा. श्रद्धा हवी. आपल्याला तुरीया, आत्मा, अनात्मा, योग अमुक तमुक काही माहित नाही, पण मला एकच मला माहितेय की, माझे जे कुणी गुरू आहेत, जे कुणी माझे इष्ट दैवत आहे त्यावर माझी श्रद्धा आहे. एवढा भाव असणंच गरजेचं आहे. त्याने बाकी सगळं आपोआप साध्य होतं.
आता हे ऐकायला, वाचायला जरी सोपे वाटलं तरी हेच सर्वात अवघड आहे. कारण बऱ्याच वेळेला आपली श्रद्धा असते असे आपण म्हणतो पण, ती काय ठरू शकते, हे पण दास पुढच्या ओळीत सांगतात, ‘ती श्रद्धा असावी ढंब म्हणजे दंभ नसावा.’
अध्यात्म मार्गात क्षणोक्षणी पदोपदी मार्गदर्शन करणारं असं माहिपती दासांचं साहित्य आहे. दंभ म्हणजे थोडक्यात आव आणणे. देवासमोर हात जोडलेले असतात पण ते मनापासून नसतं. यांत्रिकीकरण त्यात खूप असतं. हे आपल्या कडून होणार नाही आणि जे करू ते श्रद्धेने करू हा प्रयत्न आपण करूया. एका रात्रीत जमेल असं नाही पण प्रयत्नाने जमेल. अशीच प्रार्थना आपण देवाजवळ करू की तुझ्यावर खरी श्रद्धा, निष्ठा आमची असू दे. दांभिकतेने काही होत असेल तर ते दूर कर.
LikeShow more reactions
Comment

No comments: