Sunday, July 17, 2016

श्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला "तत्त्ववाद" - भाग ३
तत्त्ववादाचे पहिले प्रमेय आपण पाहिले. हरिः परतरः असे ते आहे. आता दुसरे प्रमेय बघुया.
२. सत्यं जगत् - जगन् मिथ्या आहे हे आपण सर्वच ऐकत आलेलो आहोत. मिथ्या म्हणजे खोटे असा सामान्यतः अर्थ होतो. पण क्षणिकत्त्वासाठी मिथ्या हा शब्द वापरला आहे असे अद्वैतमतवादी म्हणतात. आज आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी जश्या आहेत, तश्या त्या उद्या नसतील. त्यात काहीतरी बदल होणार आहे, यासाठी त्यास "मिथ्या" असे संबोधले जाते. मग काहीजण म्हणतात खरे आणि काहीजण म्हणतात खोटे या तर विरूद्ध गोष्टी आहेत. आणि विरुद्ध गोष्टी वादाला कारणीभूत ठरतात आणि त्यामुळे मिथ्याचा आणि सत्याचा वाद चालू राहिलेलाच आहे. पण यात वाद घालण्यासारखे खरंच काही आहे का ते आपण पाहू.
मध्वाचार्य हे काही नुसते विचारवंत नव्हते. विचारवंतांच्या सिद्धांतांमध्ये दोष असतात. पण सत्पुरूषांच्या सिद्धांतांमध्ये दोष नसतात. कारण ‘आधी केले, मग सांगितले’ हा भाव त्यात असतो. तत्त्वावादाविषयीच्या पहिल्या भागात जसे आपण बघितले की, मध्वाचार्य झटले ते खरा वेदार्थ प्रत्येकाला आपल्या जीवनात आचरता यावा यासाठी. कुठलाही सिद्धांत हा जर आपल्याला आपल्या आचरणात आणताच आला नाही तर त्याचा उपयोग काय? हेच मध्वाचार्यांचे कार्य आहे. केवळ विरोधाला विरोध आणि वाद निर्माण करण्यासाठी मध्वाचार्यांनी सत्यं जगत् सांगितलेले नाही.
द्वैत म्हटले की, दृश्य आले, दृश्य आले की त्यात अडकणे आले वगैरे आपण द्वैताबद्दल केली जाणारी शेरेबाजी ऐकतो. हा अर्थ खूपच प्राथमिक अर्थ आहे आणि तो खरा देखील आहे. पण मध्वाचार्यांनी या पलिकडे सांगितलेले आहे. जो सत्पुरूष वयाच्या १६व्या वर्षी आपणहून संन्यासाश्रम स्वीकारण्यासाठी गुरूंकडे जातो, जो जनमानसला शुद्ध भक्तीचा मार्ग दाखवतो, ज्या सत्पुरूषास भगवान वेदव्यास ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्यास सांगतात, तो सत्पुरूष या जगातील दृश्य वस्तूंमध्ये अडकेल का? किंवा त्या दृश्यात अडकण्यास सांगेल का? याचा प्रत्येकानेच विचार करावा. आज जगात जे जे दृश्य दिसत आहे ते तसे राहणार नाही हे मध्वाचार्य स्वतः सांगतच आहेत. फक्तं मध्वाचार्य एक महत्त्वाची गोष्टं सांगतात ती अशी की, जगातील दृश्य वस्तू आज आहेत, तश्या राहणार नसल्या तरी त्याचे अस्तित्त्व आपल्याला नाकारता येणार नाही. भगवंतापर्यंत जायचे असल्यास आपण जे साधन करू ते या जगात राहूनच, या जागतील दृश्य वस्तूंच्या साहाय्यनेच करणार आहोत आणि म्हणून त्याचे अस्तित्तवंही तितकेच महत्त्वाचे आहे. वेद-ग्रंथ, पुराणे यातून आपल्याला भगवंताचा बोध होतो, आणि त्यातील ज्ञान आचरता येते या जगात राहूनच, त्यामुळे ते मिथ्या नाही. भगवंतापर्यंत जायचे, ते या जगात राहूनच म्हणून हे जग सत्य आहे. या जगाला, मध्वाचार्य सुरेख शब्द वापरतात, जो प्रत्येक साधाकाने लक्षात ठेवावा. जगातील वस्तू नाशिवंत आहेत हे विचारात घेऊन जगाकडे साधनभूमी म्हणून बघावे.
जग मिथ्या आहे आणि जग सत्य आहे यावरून विद्वानांनी वाद का घातले असतील? यात कुठे काही वाद घालण्यासारखे आहे? प्रत्येकानेच ठरवा. पण हे जग साधनभूमी आहे असे म्हणून साधन करीत राहा. ते मात्र कुणीच विसरता कामा नये.
क्रमशः

No comments: