Sunday, July 17, 2016

श्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला "तत्त्ववाद" - भाग ४
हे जग नाशिवंत आहे पण त्याचबरोबर ती साधनभूमी असल्यामुळे ते सत्य आहे असे सांगून पुढचे प्रमेय तत्त्वतः भेद: असे सांगितले.
३. तत्त्वतः भेद: - प्रत्येक आचार्यांनी जसे अनुभवले आणि प्रत्येकाच्या अवतार कार्याप्रमाणे त्यांनी त्यांचे-त्यांचे सिद्धांत मांडले. त्यांचे सिद्धांत ही आपल्यासाठी व्यवस्था आहे. त्याची कास धरून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. पण बऱ्याचदा या सिद्धांतांचा उपयोग वाद घालून, कुणाचे मत कसे श्रेष्ठ आहे, यासाठीच केला जातो. कुठलेही आचार्य आपणहून जाऊन वाद घाला असे सांगत नाहीत. जर आपल्याला कुणी विचारले तर सांगावे. पण आपला वेळ हा मुखत्वेकरून साधनालाच दिला पाहिजे. ज्याला जो सिद्धांत पटेल, त्याने तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. वेदांत म्हटला की अद्वैत तत्त्वज्ञान असे समीकरण आहे. आणि त्यामुळे ब्रह्म सत्यं जगन् मिथ्या, आत्मा हा एकच आहे, जीव आणि ब्रह्म वेगळे नाहीत, हे अद्वैत तत्त्वज्ञानाचे सिद्धांतही सहाजिक आपण ऐकत आलेलो असतो. आणि त्यामुळेच यापुढील तत्त्ववादाचे सिद्धांत आपल्याला नवीन वाटू शकतात. यापुढील प्रमेय ही आपल्या प्रत्येकाच्या डोक्यातील असलेल्या संकल्पनांपेक्षा वेगळी वाटू शकतात. तेव्हा या तत्त्वावादाच्या सिद्धांतांविषयी मनात कुठलेही पूर्वग्रह दूषित न ठेवता, हे सिद्धांत प्रत्येकाला प्रत्येकाच्या साधनात उपयोगीच पडतील यासाठी श्रोता व्हावे सावधान । एकाग्र करूनिया मन या भावनेने आपण ते ग्रहण करावेत याकरीता ही प्रस्तावना.
मध्वाचार्य हे प्रत्येकाला विचार करायला सांगतात. ब्रह्मतत्त्व हे तर्क,बुद्धीने जाणता येत नाही हे खरे असले तरी त्या दिशेने वाटचाल करताना प्रथम बुद्धी एका कश्यावर तरी स्थिर करावी लागते. जसे बालवाडी (नर्सरी) हा प्रकार असतो, त्यात शिकवल्या जाणाऱ्या ज्ञानावर काही आपण लगेच दहावीत जाऊ शकत नाही. पण दहावीपर्यंत जाण्यासाठीचा तो पाया असतो, त्याप्रमाणे बुद्धी हा पाया आहे. आणि म्हणून मध्वाचार्य आपल्याला ती बुद्धी वापारायला सांगत आहेत. विचार करा, बुद्धी वापरा, आपल्या बुद्धीला पटतंय का ते बघा आणि मगच इथला प्रवास सुरू करा. अर्थात भगवंताच्या, सद्गुरूच्या कृपेशिवाय या वाटेवर येता येत नाही आणि आलो तरी त्यावर टिकणे हेही त्याच्या कृपेशिवाय शक्य नाही. पण आपण आपला हात द्यावा मग तो त्याचा हात देईल. यासाठी आपल्या बाजूने हा प्रयत्नांचा भाग.
साधन करण्यासाठी, या शुद्ध भक्ती मार्गासाठी सत्यं जगत् सांगितले. आणि त्यानंतर, जीव हा एकच नसून बरेच आहेत आणि ते एकमेकांपासून भिन्नं आहेत. तसेच परमात्माही जीवापासून वेगळा आहे. जीव, जड आणि परमात्मा हे एकमेकांपासून भिन्नं आहेत अशी परमोपनिषद श्रुती आहे.
जीवेऽश्वर भिदा चैव जडेऽश्वर भिदा तथा ।
जीवभेदो मिथश्चैव जडजीव भिदा तथा ।
मिथश्च जडभेदोऽयं प्रपञ्चो भेद पंचकः ॥ - परमोपनिषद
जीव, जड, परमात्मा हे कुठल्या ना कुठल्यातरी गुणांनी युक्त आहेत. यातील परमात्मा हा तर अनंत परिपूर्ण गुणांनी युक्त आहे. ज्यात कुठलेही दोष नाहीत. पण जीव आणि जडांच्या बाबतीत हे लागू होत नाही. त्यातील गुणांसमवेत दोषही त्यात आहेतच. दोष नसले, तरी अनंत गुण आणि गुण परिपूर्णत्त्व त्यात नसते. आत्मा आणि परमात्मा हा फरक याकरीताच आहे. समस्त जीवांमध्ये जो श्रेष्ठं आहे, सर्वोच्च आहे, परम आहे असा तो परमात्मा. याचा अर्थ जीवही बरेच आहेत आणि त्यांच्यापेक्षा सर्वोच्च असा कुणीतरी आत्मा आहे. आणि यामुळेच परस्परातील भिन्नत्त्वं सिद्धं होते. प्रत्येकाचे ‘स्व’रूप देखील वेगळे आहे. आचार्यांच्या मते नेति नेति सारख्या श्रुती सुद्धा तेच सांगतात की, परमात्मा म्हणजेच आत्मा असे आपण म्हणत असलो तरीही तसे नाही तो परमात्मा आपल्याहून वेगळा असा आहे.
शुद्ध भक्तीच्या या मार्गात हा महत्त्वाचा असा सिद्धांत आचार्यांनी मांडला आहे. या सिद्धांतामुळे आचार्यांच्या तत्त्वज्ञानाला "भेदवाद" असेही नाव पडले. या सिद्धांतामुळे भगवंत आणि मी त्याचा दास, हा भाव निर्माण होण्यास मदत होते व त्याच्या कृपेने कालांतराने तो भाव अधिक दृढ होतो. तेव्हा हा सिद्धांत त्या गुणपरिपूर्ण अशा भगवंताचे दास्य करण्यासाठी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करू.
क्रमशः

No comments: