Sunday, July 17, 2016

द्वैतमताचे स्थापक श्री मध्वाचार्य यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. हे चरित्र थोडक्यात देत आहे. नंतर आपण पुढील दिवसात ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
मध्वाचार्य (१२३८-१३१७)
मध्वाचार्य आनंदतीर्थ आणि पूर्णप्रज्ञ या नावांनीही ओळखले जातात. ते वायु देवाचे अवतार आणि द्वैत मताचे स्थापक आहेत. वायुचा पहिला अवतार हनुमान, दुसरा भीम आणि तिसरे मध्वाचार्य अशी धारणा किंवा एक अख्यायिका नसून पवमान सूक्तं, बळित्था सूक्तं, वायु पुराण, स्कंद पुराण, परशुराम महात्म्य यात वायु आणि त्याच्या पुढील अवतारांचा उल्लेख आहे त्यानुसार मध्वाचार्य हे वायु देवाचा तिसरा अवतार आहेत. त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडले त्यास "तत्त्ववाद" असे म्हणतात. त्यांचे तत्त्वज्ञान भक्तीमार्गाला अनुसरून आहे.
जन्म : एक अपंग व्यक्ती एका देवळाच्या ध्वज स्तंभावर उभी राहून आज वायु देव वैदिक धर्म बळकट करण्यासाठी, सुधारण्यासाठी जन्मं घेणार आहेत असे सांगत होता. त्याप्रमाणे १२३८ साली विजयादशमीच्या दिवशी उडुपी जवळील "पाजकक्षेत्र" येथे मध्वाचार्यांचा जन्मं झाला. त्यांचे वासुदेव असे नाव ठेवण्यात आले. मध्यगेह भट्ट हे त्यांच्या वडिलांचे आणि वेदवती त्यांच्या आईचे नाव होते. लहानपणापासूनच त्यांना भगवान नारायणावर विशेष प्रेम होते. बुद्धी तल्लख होती त्यामुळे वडिलांकडून सुरूवातीचा विद्याभ्यास खूप लवकर आत्मसात केला. त्यानंतर सातव्या वर्षी त्यांचे उपनयन करण्यात आले आणि पुढील अध्ययन सुरू झाले. याचबरोबर ते बलशाली होते. पोहण्यात तरबेज होते. शरीराची ताकद, धष्टपुष्ट असे शरीर आणि भारत भ्रमण या दोन्ही गोष्टी आपल्याला दोन सत्पुरूषांच्या बाबतीत बघायला मिळतात. एक म्हणजे मध्वाचार्य आणि दुसरे महाराष्ट्रातील १६व्या शतकातील एक थोर सत्पुरूष समर्थ रामदास स्वामी.
कार्य : वयाच्या सोळाव्या वर्षी वासुदेवाने एकदंडी एकांती वैष्णव परंपरेतील अच्युतप्रेक्षतीर्थ यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. आणि त्यांचे पूर्णप्रज्ञ असे नाव ठेवण्यात आले. मध्वाचार्यांनी गुरूंकडून अद्वैतानुसार सगळे अध्ययन पूर्ण केले. पण त्यांचे समाधान होत नव्हते. म्हणून त्यांनी स्वतः पुन्हा उपनिषदे, गीता,इतिहास, पुराणे आणि ब्रह्मसूत्रांचा अभ्यास केला. आणि त्यानंतर ज्यासाठी अवतार झाला होता ते द्वैतमत स्थापन केले. विशेष म्हणजे त्यांचे गुरू अच्युतप्रेक्षतीर्थ यांनीही ते द्वैतमत मान्य केले आणि असा शिष्यं मिळणे हे आपले भाग्यच समजले.
यानंतर त्यांनी गुरू आज्ञेनुसार मत प्रचार करण्यास सुरूवात केली. अनंतशयन, कन्याकुमारी,श्रीरंगपट्टण,रामेश्ववरम या ठिकाणांचे संचार करत असताना त्यांनी दर्शन घेतले. हा संचार करत असताना त्यांनी त्यांचा तत्त्ववाद हा लोकांना समजावून सांगितला. त्यांची प्रवचने त्याविषयीच चालत. त्यावेळचे विद्वान कर्मठ लोकांचा त्यांच्या सांगण्याला विरोध होता. पण आचार्यांचे कार्य ठरलेले होते. त्यांनी कर्मठ विद्वानांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून आपल्या मताचा प्रचार केला. आपण अनुभवलेले सत्य ब्रह्मसूत्र, गीता या सगळ्यात आहे म्हणूनच त्यांनी उडुपी येथे श्रीमद्‍भगवत गीतेवर भाष्य लिहिले.
भगवान नारायण रामचंद्र असताना हनुमानांनी त्यांची सेवा केली. कृष्ण असताना भीमाने त्यांची सेवा केली आणि वेदव्यास असताना मध्वाचार्यांनी त्यांची सेवा केली. मध्वाचार्यांनी बद्रीसाठी प्रयाण केले. तिथे वेदव्यासांच्या प्रेरणेनुसार त्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले. आता त्यांचे नाव पंचक्रोशित पसरले होते. सर्व विद्वान मंडळी त्यांच्या मताचा स्वीकार करत होती. उत्तर भारतातून परत येत असताना गोदावरी नदीच्या जवळील भागातील अद्वैतावादी, तर्कशास्त्रात निष्णात, व्याकरणात पक्के अश्या एका शोभन भट्टं नावाच्या विद्वानाशी मध्वाचार्यांची गाठ पडली. त्यांच्यात द्वैत अद्वैताचा वाद झाला त्याची परिणीती शोभन भट्टं हे मध्वाचार्यांचे शिष्यं झाले आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा संन्यास दीक्षा घेण्याचे भाग्य त्यांना लाभले.
कृष्णमूर्ती स्थापना : उडुपीच्या समुद्र किनाऱ्यावर नेहमीप्रमाणे ध्यानासाठी गेलेले असताना वादळात अडकेलेली दिशाहीन नौका आचार्यांना दिसली. त्यांनी आपली छाटी दाखवून त्यांना किनाऱ्याकडे सुखरूप आणले. ती व्यापारी नौका होती. त्यात द्वारकेतील चंदनाचे खडे होते. त्याचा मालक मध्वाचार्यांना म्हणाला तुमच्यामुळे आम्ही सुखरूप आहोत ही आमच्याकडून तुम्हाला भेट. आम्ही संन्यासी आहोत आम्ही काय करणार या भेटवस्तूंचे? तुम्हाला काहीतरी घ्यावेच लागेल असे म्हटल्यावर आचार्यांनी ठीक आहे द्यायचेच असेल तर भगवंताला प्रिय असणारा चंदनाचा एक खडक द्या. त्याने तो आणून दिला. आणि आशिर्वाद घेऊन निघून गेले. मध्वाचार्य तो खडक उचलून भगवंताची स्तुती गात गात येत होते. यालाच द्वादश स्तोत्रं असे म्हणतात. या बारा अध्यायात भगवंताच्या गुणांविषयी, अवतारांविषयी सांगितलेले आहे. त्यांनी तो खडक सरोवरात टाकला टाकल्यानंतर त्यातून एक रवीधर कृष्णाची मूर्ती बाहेर आली. मुरलीधर,चक्रधर,राधाधर कृष्ण आपण बघतो पण रवीधर कृष्ण हा फक्तं उडुपी येथेच आहे. नंतर आचार्यांनी कृष्णाची स्थापना केली. तो रवीधर कृष्ण आजही आपल्यातल्या दोषांचं मंथन करून आपल्यातील भक्ती वाढवण्यासाठी उडुपी येथे आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन : काही यज्ञांसाठी प्राण्यांचा बळी द्यावा लागत असे हे आचार्यांना सहन झाले नाही. वैदिक कर्म महत्त्वाचे आहे पण त्यासाठी आपण एका निष्पाप जीवाचा बळी देणे हे आचार्यांना सहन झाले नाही. यासाठी त्यांनी एक उपाय सांगितला आहे, पीठापासून प्राण्यांची प्रतिकृती तयार केली जाऊ शकते आणि त्यावर आपण आपले वैदिक कर्म करू शकतो. सुरूवातीला हे श्रुतींना धरून नाही म्हणून त्यावेळच्या ब्राह्मणांनी विरोध केला पण आचार्य म्हणाले आपण त्यातील योग्य अर्थ घेणे अपेक्षित असते, ज्या श्रुती आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतात, तो भगवंत, जो हे जीव निर्माण करतो, मग त्यांना मारणे हे खरे म्हणजे श्रुतींना अनुसरून नसले पाहिजे. नंतर सर्व ब्राह्मणांना हे पटले आणि त्यांना या उपायाचा स्वीकार केला. निर्मूलन बंडखोरीने नाही तर सामंज्यसाने अभ्यासाने सुवर्णमध्य काढून करता येते हेही आपले आचार्य आणि सगळेच पूर्वज आपल्याला शिकवून गेले आहेत!
यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बद्रीसाठी प्रयाण केले. तेथे वेदव्यासांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महाभारत तात्पर्य निर्णय हा ग्रंथ लिहिला. परत येताना त्यांनी काशी आणि नंतर गोवा येथे भेटी दिल्या. तेथे त्यांनी भगवंतावरची सुरेख पदे गायली जी तिथल्या लोकांना विशेष आवडली. सामर्थ्यावार,बलशाली शरीर, तल्लख बुद्धी याच बरोबर आचार्य फार सुरेख गात.
त्यांच्या दुसऱ्या यात्रेनंतर ते उडुपी येथे आले. आणि त्यांनी कृष्णाच्या नित्यपूजेसाठी आठ मठांची स्थापन केली. तेच अष्ट-मठ म्हणून आजही उडुपी येथे आहेत. यानंतर १३१७ साली वयाच्या ७९व्या वर्षी अवतार कार्य संपवून आपल्या तत्त्ववादाची धुरा आपल्या शिष्यांकडे सोपवून अंतर्धान पावले.

No comments: