Sunday, July 17, 2016

मध्वाचार्यांचे पहिले शिष्य श्री श्री पद्मनाभतीर्थ
॥ श्रीराम ॥
श्री श्री पद्मनाभतीर्थ (१३१७-१३२४)
गुरू : श्री मध्वाचार्य
शिष्य : नरहरी तीर्थ
आराधना तिथी : कार्तिक कृ. चतुर्दशी
वृंदावन स्थळ : नव-वृंदावन.
द्वैतमताचे स्थापक श्री मध्वाचार्य म्हणजेच आनंदतीर्थ यांचे हे शिष्य. साक्षात मध्वाचार्यांचे शिष्यं होण्याचे भाग्य पद्मनाभ तीर्थांना लाभले. पूर्वाश्रमात पद्मनाभ तीर्थांचे नाव "शोभन भट्ट" होते. ते अद्वैत मताचे त्याकाळचे मोठे विद्वान होते. अद्वैत तत्त्वज्ञानात ते निष्णात होते. तर्कशास्त्रात ते पारंगत होते. वेद, पुराणांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. ते गोदावरी नदी जवळच्या भागातून उदयास आले. त्यांनी मोठ्या मोठ्या विद्वानांचा वादात पराभव केला होता. त्यांची ख्याती पंचक्रोशीत पसरली होती. यानंतर त्यांचा साक्षात मध्वाचार्यांशी वाद झाला. आणि त्याचे रूपांतर शोभन भट्टांचे द्वैतमत स्वीकारून मध्वाचार्यांकडून संन्यास घेण्यात झाले. द्वैतमत तर्कावर आधारलेले आहे, परत वेद उपनिषदांचा अर्थ ते व्याकरणाप्रमाणे घेतात त्यामुळे ते वाद जिंकतात असे सर्वांचे म्हणणे असते. पण पद्मनाभतीर्थांकडे पाहिले तर हे आपल्याला लक्षात येते की, ते आधीचे शोभन भट्ट तर्कशास्त्रात पारंगत परत अद्वैती, वेद-उपनिषदांचा अभ्यास मग तसे पाहायला गेले तर मध्वाचार्य त्यांना कसे हरवू शकले? याचं उत्तर म्हणजे, मध्वाचार्यांकडे आत्मानुभव होता जो शोभन भट्टांकडे नव्हता. त्यामुळे तर्क, व्याकरण या गोष्टी असल्या तरी जेथे अनुभव नाही तेथे याचा उपयोग नाही. ब्रह्मानंद महाराज आणि गोंदवलेकर महाराज यांचा प्रसंगही असाच आहे. ब्रह्मानंद प्रचंड विद्वान होते. महाराजांकडे आल्यावर ते एकच म्हणाले माझी विद्वत्ता घेतली म्हणा. महाराज म्हणाले अरे मी गावातलं काही शिकलो नाही तू एवढं शिकलेला आहेस मी कोण तुझी विद्या घेणारा पण तेव्हा ब्रह्मानंद म्हणाले पण जे तुमच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आहे ते या विद्येने मला दिलं नाही. आणि तो म्हणजे आत्मानुभव!
१२६३ मध्ये मध्वाचार्यांचे शिष्यत्त्व स्वीकारल्यावर आता गुरूंशिवाय आपल्याला काही नाही. त्यांनी आपल्याला दिलेल्या मताचा आणि त्यांच्या सर्व वाङ्मयाचा प्रसार हेच कार्य करायचे हे पद्मनाभतीर्थांनी जाणले. मध्वाचार्यांच्या ग्रंथांचा अर्थ अधिक सुलभ रितीने समजता यावा यासाठी त्यांनी त्यांच्या ग्रंथांवर टीका केली. सतर्क रत्नावली आणि सन्याय रत्नावली ही त्यांची ब्रह्मसूत्रभाष्य आणि अणुव्याख्यानावरची टीका पद्मनाभतीर्थांनी लिहिली. याशिवाय आनंदमाला, वायुलीलाविस्तारणा, मायावादखंडन, उपाधीखंडन असे ग्रंथ रचले. १३१७ मध्ये मध्वाचार्य बद्री येथे अंतर्धान पावले आणि तेव्हापासून पद्मनाभतीर्थांनी माध्वं सांप्रदायाची धुरा सांभाळली. सात वर्ष श्री रामचंद्रांची पूजा करून समाधी घेण्याच्या अगोदर त्यांनी नरहरी तीर्थांना शिष्य केले आणि सर्व कारभार दिला. तसेच मध्वाचार्यांनी पूजा केलेली गोपीनाथ देवाची मूर्ति लक्ष्मीधरतीर्थ यांना दिली. ध्रुवाचे अंश असलेल्या श्रीपादराज स्वामींनंतर तोच मठ पुढे श्रीपादराज मठ म्हणून नावारूपास आला. १३२४ साली श्री पद्मनाभतीर्थांनी नव-वृंदावन "अनेगोंदी" तुंगभद्रेच्या काठी समाधी घेतली.
पूर्णप्रज्ञकृतं भाष्यमादौ तद्‍भावपूर्वकम ।
योव्याकरोन्नमस्तस्मै पद्मनाभाख्ययोगिने ॥
श्री मध्वसंसेवन लब्ध गोपाकृतीर्भक्ति निषेवणेन ।
लोकेषु विख्यात सुकीर्तिमंतम् श्रीपद्मनाभार्य मुनिं प्रनौमि ।।
पद्मनाभतीर्थांनी रचलेले ग्रंथ :
मायावाद खंडन टीका
उपाधी खंडन टीका
प्रपंचमिथ्यत्त्वनुमान खंडन टीका
कथा लक्षण टीका
गीता भाष्य टीका
गीता तात्पर्यनिर्णय टीका
सत्तर्क दीपावली (ब्रह्मसूत्रभाष्य टीका)
सन्न्याय टीका
तत्त्वोद्योत टीका
प्रमाणलक्षण टीका
विष्णुतत्त्वनिर्णय टीका
वायुलीला विस्तारण
तत्त्वविवेक टीका
कर्मनिर्णय टीका
तत्त्वसंख्यान टीका

No comments: