Sunday, July 17, 2016

श्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला "तत्त्ववाद" - भाग १
१६व्या वर्षी वासुदेवाने अच्युतप्रेक्षतीर्थांकडून संन्यास दीक्षा घेतली. आणि त्याचे पूर्णप्रज्ञ असे नाव ठेवण्यात आले. त्यांनी ज्या रचना केल्या त्या आनंदतीर्थ किंवा सुखतीर्थ या नाममुद्रेने. पण ते प्रसिद्धं झाले ते मध्वाचार्य नावाने. वेगवेगळ्या मतांच्या आचार्यांनी जे अनुभवले ते सांगितले. ते अनुभवले या जगात राहून. त्याचे मिथ्यत्त्व मान्य केले आणि मायेचे वर्चस्व मान्य केले तर आलेला चूक किंवा बरोबर अनुभवही मिथ्या म्हणावा लागेल. इथूनच तत्त्ववाद सुरू होतो.
तत्त्ववादी आणि अद्वैतवादी किंवा अन्यही एकमेकांशी वाद घालत असले तरी येथील वादाचा तो अर्थ नाही. परब्रह्म तत्त्वाविषयी, ते जाणून घेण्याविषयी जे सांगितले त्यास "तत्त्ववाद" म्हणतात. मध्वाचार्य म्हटले की "द्वैतमत" एवढेच आपल्या मनात येते. पण थोडा त्यापलिकडचा विचार आपण येथे करणार आहोत. मध्वाचार्यांनी स्वतः किंवा त्यांच्यावर लिहिणाऱ्या कुणीही त्यांच्या मतास द्वैतमत म्हटलेले नाही. त्यांच्या विषयीच्या एका श्लोकात आपल्याला याचा उल्लेख सापडतो.
योविप्रलम्ब विपरीत मतिप्रभूतान वादान निरस्य कृतीवान‍ भुवि"तत्त्ववादम‍" ।
तत्त्ववाद आधी येतो मग द्वैतमत येते. आचार्यांनी सांगितलेल्या पंचभेदांमुळे ते द्वैतमत आहे. पण तत्त्ववाद हा मुख्य आहे. तो जाणून घेतला तर मग द्वैता-अद्वैता पलिकडे पाहता येईल.
द्वैत म्हटले, की फक्त द्वैत एवढेच गृहीत धरून आपण ते मत जाणून घेत नाही. वेद, उपनिषदे तर अद्वैत तत्त्वज्ञान सांगतात आणि इथे फक्त द्वैत देहात असताना ठिक आहे पण देह सोडल्यानंतरही इतकेच नव्हे तर मुक्तीतही? मग चार मुक्तींपैकी सायुज्य आणि सारूप्य तर इथे होणारच नाही कारण भगवंत हा आपल्यापेक्षा वेगळा आहे आणि तो तसाच कायम वेगळाच राहतो. हे आणि असे असंख्य प्रश्नं आपल्या मनात सहाजिकच येतात. या आणि अश्याच अजून प्रश्नांच्या उत्तरांसाठी आणि तत्त्ववाद थोडक्यात जाणून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.
खरा वेदांचा अर्थ प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात आचरता येईल, आणि भगवंताविषयी भक्ती वाढून या जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त होता येईल यासाठी मध्वाचार्य झटले. सगळ्याच आचार्यांनी मानवाच्या उद्धारासाठी आयुष्य वेचले आहे. आपल्या बुद्धीला पटेल आणि तत्त्वज्ञान आपण आपल्या जीवनात उतरवू शकू यासाठी मध्वाचार्यांनी विशेष कार्य केले आहे. आणि यासाठीच त्यांचा तत्त्ववाद महत्त्वाचा आहे. मध्वाचार्य म्हणजे द्वैत या समीकरणा पलिकडे जाऊन आपण तत्त्ववाद समजून घेतला पाहिजे.
जीवांमधील उच्च, उत्तम असा जीव म्हणजे वायू आहे. वायू प्रत्येक जीवात निवास करून आहे. आपला श्वासोच्छ्वास ही त्याचीच खूण आहे. असा उत्तमातला उत्तम, श्रेष्ठ वायू ज्याची भगवंतावर विशेष प्रिती आहे. भगवंतांशी अधिक निकटचा संबंध वायूचा आहे. आणि अश्या वायूचे अवतार म्हणजे मध्वाचार्य मग ते भगवंताविषयी जे काही सांगतील त्यातील काना, मात्रा, ऊकार, वेलांटी सर्व काही सगळे सत्य आहे. भगवंताने त्या कार्यासाठीच त्यांना पृथ्वीवर पाठवले. परशुराम माहात्म्यात याचा उल्लेख आढळतो -
ब्राह्मणा तो रक्षिल । विष्णुभक्ती तो वाढवील । पाषंडियासी जिंकील । ईश्वराज्ञेनी ॥
(अध्याय ३२वा ओवी ३५वी)
मध्वाचार्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाने सर्व ग्रंथ अभ्यासले. पण जो अनुभव आला, तो अद्वैत तत्त्वज्ञानाप्रमाणे नव्हता. आणि त्यानंतर बद्री येथे स्वतः वेदव्यासांनी दर्शन दिले. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने, प्रेरणेने ब्रह्मसूत्र भाष्य लिहिले. आणि हेच तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्ववाद! हे मत म्हणजे वेदग्रंथामधील व्याकरणाप्रमाणे घेतलेला अर्थ, आपल्या सोयीने लावलेला अर्थ, किंवा काही श्रुतींचा अर्थ द्वैत तत्त्वज्ञानाप्रमाणे आहे मग फक्तं त्याचाच आधार घेऊन मध्वाचार्यांनी मत स्थापले असे वाटत असल्यास त्यात तथ्य नाही. मध्वाचार्यांचा आत्मानुभव तर येथे आहेच पण इतिहासात अश्या नोंदी आहेत की मध्वाचार्यांनी जे भारत भ्रमण केले तेव्हा ते अनेक पंडितांना भेटले. त्यांच्याकडून किंवा इतर ठिकाणहून मिळतील तसे वेदांवरील, पुराणांवरील अनेक दुर्मिळ ग्रंथ मिळवले. उडुपी येथे ते जिथे राहत असत तिथे त्यांचे एक प्रचंड मोठे असे ग्रंथालय होते. याचा अर्थ असा की, वेद-पुराणांमधला नेमका अर्थ जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, जे प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात आचरता येईल असा सिद्धांत प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा आणि भगवंतावर अनन्य भक्ती हा मुख्य मार्ग हा संदेश सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्वाचार्यांनी आपले आयुष्य वेचले. असा हा तत्त्ववाद आपण जाणून घेऊ. विस्तृतपणे आपण नंतरच्या काळात तत्त्ववाद जाणून घेणारच आहोत पण थोडक्यात जाणून घेण्यासाठी श्री व्यासतीर्थांच्या तत्त्ववादाविषयीच्या एका श्लोकाचा आपण अभ्यास करू.
क्रमश:

No comments: