Sunday, July 17, 2016

श्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला "तत्त्ववाद" - भाग ५
जीवगणः हरेः अनुचराः - मध्वाचार्यांनी सांगितलेल्या पंचभेदामुळे म्हणजे ईश्वर,जीव,जड हे एकमेकांपासून भिन्न आहेत या सिद्धांतामुळे त्यांच्या मतास भेदवाद असेही म्हणतात. तत्त्वतः भेद या प्रमेयानंतर पुढचे प्रमेय जीवगणः हरेः अनुचराः असे सांगितले.
भगवंताने सृष्ट केलेली ही सृष्टी, हे विश्व आणि या विश्वातील जीव, त्यांचे आयुष्य, त्यांची सुखं-दुःखं हे सगळे आपण बघत असतो. आणि मग त्या सगळ्याकडे बघून त्यात भिन्नता आणि भिन्नताच आढळते. विविधतेमध्ये एकता हे वाक्य म्हणून छान आहेच. पण वास्तव हे निराळेच असते. मग साधक म्हणून प्रत्येकाच्या हातात काय आहे? जर भिन्नता दिसत आहे आणि ती प्रत्येकाच्या साधनेच्या अनुषंगाने केलेली आहे तर त्याचा स्वीकार करावा. म्हणजे असं की सगळेच काही भक्तीमार्गाने जात नाहीत किंवा सगळेच काही योग किंवा ज्ञान मार्गाने जात नाहीत. त्यामुळे यात भेद असला तरी एका मार्गाला धरावे आणि आपला उद्धार साधावा. मध्वाचार्यांचा शुद्धभक्ती मार्ग आहे त्यामुळे तो भगवंत हा माझा स्वामी आहे आणि मी त्याचा दास आहे हाच भाव आपल्याला ठेवायचा आहे. कारण आत्ता प्रत्येकजण ते अनुभवत आहे. तत्त्वज्ञानाकडे अति लक्ष दिले की, नेमकं काय करायचं हे बाजूला राहतं. तत्त्वज्ञान माहित असो किंवा नसो साधन तर करावच लागतं. तत्त्वज्ञानाचे चिंतन करताना तत्त्वज्ञानाविषयी असे प्रतिपादन करणे चूकीचे वाटू शकेल. पण मध्वाचार्य हे, नेमकं काय करायला पाहिजे ते सांगतात. आणि त्यात भक्तीला महत्त्व आहे. मग आता आपल्याला दोन प्रश्न पडतील? मग जीवांमध्ये ही भिन्नता का? आणि आपण नेमके काय करायचे?
मध्वाचार्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ईश्वराप्रमाणे जीव हा देखील अनादि आहे. मग आपल्याला प्रश्न पडेल की मग मोक्षाची व्याख्या कशी असेल इथे? आणि सृष्टीचा संहार होतो मग तिचा पुन्हा उदय होतो मग भगवंताला असे वाटते की हा सृष्टीचा खेळ मांडावा वगैरे वगैरे याचे काय?
सृष्टी निर्माण करणे म्हणजे असलेलीच गोष्ट सृष्ट करणे. त्यात वेगळे असे काही निर्माण करण्यासारखे नसते. विनाशाच्या वेळी भगवंताने जी सृष्टी आपल्यात सामावून घेतली ती तो फक्त सृष्ट करतो बाहेर काढून, दाखवतो. कुठून बाहेर काढतो? पंचमहाभौतिक देह नाही परमात्म्याला, तो निकारार आहे ना? सत्त्व, रज, तम यापलिकडे जे आहे ते निर्गुण आणि निराकार एवढंच आपल्याला माहित आहे. पण सहस्त्रशीर्षा पुरूषः । सहस्त्रसाक्षः सहस्त्रपात् । पंचमहाभौतिक देहाच्या पलिकडे असणारा असा देह भगवंताचा आहे म्हणजे एका अर्थाने तो साकार आहे. आपण ज्या इयत्तेत असतो त्या इयत्तेच्या अभ्यासापलिकडे आपल्याला माहित नसतं. हे सत्पुरूष याचसाठी असतात. आपल्याला वाटत त्यापलिकडे काय आहे हे ते सांगत असतात. त्यामुळे भक्ती करून आपण त्या योग्यतेचे झालो की, भगवंत दाखवेल पंचमहाभौतिकाच्या पलिकडचा देह कसा आहे ते. त्याचे अधिक वर्णन आचार्यांनी केलेले आहे पण तो प्रतिपाद्य मुद्दा नाही.
तर अशी भगवंतामधून सृष्टी सृष्ट होते. मग विनाशाच्या वेळेला जे जीव ज्या ज्या स्थितीला असतात तसे तसे ते सृष्टीत येतात. मोक्षाला गेलेल्या जीवांना पुन्हा यावं लागत नाही. परीक्षेमध्ये सगळे विषय सुटलेल्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागते का? पण जे नापास झालेत, ज्यांचे विषय राहिलेत त्यात पास होण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यावी लागते. तसेच आहे इथे. आणि म्हणूनच मग भक्ती, कर्म या सगळ्याला महत्त्व येते.
सुख हे जीवाचे स्वरूपभूत आहे. या जीवस्वरूपावर प्रकृति नावाचे आवरण आहे. यामुळे त्यांना या सुखाचा अनुभव येत नाही. त्यामुळे हे जीव कर्मे करतात. आणि तीच कर्मे अनेक जन्मांना कारणीभूत ठरतात. आणि यामुळे जीवांमध्ये भिन्नता आढळून येते. मग यापुढे मध्वाचार्य सांगत आहेत की, या जीवांमध्ये तीन भाग आहेत. एक आहेत ते मुक्तीयोग्य जीव. दुसरे नित्य संसारी आणि तिसरे तमोयोग्य. मग आता आपल्याला प्रश्न पडेल की, फक्त मुक्तीयोग्य जीवांनाच मुक्ती का? नित्य संसारी म्हणजे आपल्यासारख्या माणसांनी काय तेच करत बसायचे का? एक गोष्ट आपण लक्षात घेऊ हे वर्गीकरण जन्माने नाही तर कर्माने ठरते. चांगलं का वागा, साधन का करा हे सांगितलंच नाही तर कुणी का करेल? दहावीचा अभ्यास केला तर पुन्हा दहावीत यायला लागत नाही. हा विचार सातवी आठवीत करायला सुरूवात केली म्हणजे आपण दहावीला बसायला लायक होतो आणि दहावी पास होतो. तसेच आत्ता आपण नित्यसंसारी असू पण साधन करून भगवंताला शरणागत भावाने कर उद्धार माझा, असं तळमळीने सांगू म्हणजे आपण असू त्या इयत्तेतून पुढे जाऊन मुक्तीयोग्य जीव होऊ. जे आहे ते भौतिक सुख चांगलं आहे देव आहे पण मला त्याच्याशी तितके देणे घेणे नाही. भौतिक सुख घेण्यासाठी तो माझ्याकरता आहे असा विचार करणारे नित्य संसारी. या उलट जे वागतात, याहूनही वाईट कर्मे करणारे, दुसऱ्याबद्दल असूया, द्वेष आणि असं सगळं वाटून कर्मे करणारे जीव म्हणजे तमोयोग्य. आणि अशी ही सृष्टी चालते. अशी ही भिन्नता येते.
तेव्हा आपल्या हातात एवढेच राहते की, चांगली कर्मे करावीत. पण कर्मे करत असताना काय करावे? आचार्य यासाठी फार सुरेख सांगतात ते म्हणतात की,
कुरू भुंक्ष्व च कर्म निजं नियतं । हरिपाद विनम्रधियासततं ॥
जी काही आपली विहित कर्मे आहेत ती करा पण ती करताना भगवतार्पण बुद्धीने करा, त्या श्रीहरीचे स्मरण ठेवून करा, त्याच्या चरणाशी विनम्र होऊन करा. असे आपण सगळे जीवगण हे हरिचे दास आहोत हे सांगणारे हे प्रमेय.
क्रमशः

No comments: