Sunday, April 10, 2016

देहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ४)
या दास्ययोगातील हा शेवटचा भाग. या भागात दासश्रेष्ठ पुरंदरदासांच्या साहित्याबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत. वेदार्थ सहज सोप्या भाषेत भक्ती मार्गाने जनमानसापर्यंत पोहोचवणे हेच या दास साहित्याचे काम. कर्नाटकातील संगीताचे पुरंदरदास पितामह आहेत असे म्हणतात. कारण भगवंतावर पदे, भजने याचे केवळ शब्द तयार होत नाहीत तर ती संगीतासकट तयार होतात. त्यामुळे ही दास मंडळी भगवंताची स्तुती, माहात्म्य हे संगीताच्या साथीने वर्णन करत फिरत असत. कर्नाटकातील हरिदास साहित्याचा पाया हा पुरंदरदासांनी रचला आहे. आणि त्या परंपरेतच पुढे कनकदास, विजयदास, जगन्नाथदास, महिपतीदास, गोपालदास अशी दासरत्ने हरिदास साहित्याला लाभली.
पुरंदरदासांची पदे ही पंचविध भावांनी युक्त आहेत. कधी ते त्या परिपूर्ण गुणांनी युक्त परब्रह्माचे दास होतात, कधी त्याचे सखा होतात. कधी यशोदा, कौसल्या होऊन भगवंताविषयीचा वात्सल्य भाव प्रगट करतात. कधी गोपींचा शुद्ध मधुर भाव सांगातात तर कधी भगवंताच्या नामाशिवाय काही नको हा खऱ्या भक्ताचा शांत भाव दाखवतात. दासांची पदे लौकिक शब्दांची जादू नव्हे. तर प्रत्यक्ष अनुभवलेली पारलौकीक किमया आहे. दासांची पदे हे केवळ शब्द नाहीत तर त्यातील एक-एक अक्षर हे परब्रह्मच आहे. पुरंदरदासांच्या रचना म्हणजे एक नदी आहे जी आपल्याला भगवंताच्या क्षीरसागरापर्यंत घेऊन जाईल.
भक्त प्रह्लादाने जे मागितले ते देहि मे तव दास्ययोगं हे पुरंदरदासांनी पहिले मागितले. ते म्हणतात, "दासन माडिको एन्ना" "भगवंता मला तुझा दास बनव." मग दास कसा असतो? त्याने राहावं कसं? हे कळण्यासाठी भगवंताची पहिली दास ती म्हणजे लक्ष्मीदेवी हिला त्यांनी बोलावलं ते असं "सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा." "आई, ये आणि सांग या भगवंताचं दास्य मी कसं करू?" दास हे त्यांचे नाव किंवा फक्त एक पदवी नाही ते दास्य ते जगले. आयुष्यभर दास्य सोडून काहीही केलं नाही.
हे वैयक्तिक पातळीवरील दास्य असले तरी हेच त्यांच्या साधनेचे सामर्थ्य समाजाच्या पाठीशीही उभे राहिले. चार वर्णांची समाज व्यवस्था पण त्याचे वर्गीकरण उभे नसून आडवे आहे म्हणजे ते एकाच पातळीवरचे आहे जेणेकरून त्यात भेद राहणार नाही हा संदेश देण्याचे श्रेष्ठ काम दासांनी केलं आहे. सर्वच दास, संत सत्पुरूषांनी केलेले हे महत्त्वाचे काम आहे. भगवंताचे नाम त्याची भक्ती करण्याचा अधिकार हा सर्वांना आहे तेव्हा प्रत्येकाने त्या भगवंताचे नाम घ्या हा मुख्य संदेश दास अनेकवेळा त्यांच्या पदातून सांगतात.
काही पदातून हे नामाचे महत्त्व फार सुंदर रितीने ते सांगतात. आपल्या आधीच्या आयुष्याबद्दल ते एका पदात म्हणतात की, मी आधी उद्योग करायचो पण आता या भगवंताच्या नाम आणि भक्तीच्या उद्योगाशिवाय मला दुसरा कुठला उद्योग माहित नाही. भगवंताचे नाम हे खीरी सारखे आहे ती खीर खायला सगळ्यांनी या असे ते एका पदात सांगतात. ही नामाची खीर आहे तरी कशी? तेव्हा सांगतात की, "रामनाम पायसक्के, कृष्णनाम सक्करे, विठ्ठलनाम तुप्प बेरिसि, बायी चप्परिसिरो" म्हणजे ही रामनामाची खीर आहे यात कृष्णनामाची साखर आहे आणि विठ्ठलनामाचे तूप आहे अशी ही खूपच स्वादिष्ट खीर आहे.
पुरंदसदासांनी एकूण ४ लाख ७५ हजार पदे रचली. त्यात कुठल्या कुठल्या पदांचा समावेश होता हेही लिहून ठेवले आहे.
केदार ते रामेश्वरपर्यंत सर्व तीर्थक्षेत्रांचे वर्णन - १,२५,०००, श्री मध्वाचार्यांचा महिमा, गुरू व्यासतीर्थांचा महिमा, तंत्रसार देव तारतम्य - ५,०००, ब्रह्मलोक, कैलासलोक इत्यादि लोकांचे वर्णन - ९०,०००, पुराण कथांचे सार - ९०,०००, देवतांचे मूर्तिध्यान, गंडकीमाहात्म्य - ६०,०००, आन्हिक पद्धती एकादशी निर्णय - १६,०००, सुळादि (तत्त्वज्ञानाचे सार अशा पदांमध्ये आलेले असते) - ६४,०००, देवरनाम ( भजने ) - २५,०००. अशी एकूण ४,७५,००० पदे पुरंदरदासांनी रचली. पण दुर्दैवाने यातील सर्व पदे आज उपलब्ध नाहीत.
अशा दासश्रेष्ठ पुरंदरदासांची आज आराधना. पंपाक्षेत्री हंपीला पौष मासात कृष्ण पक्षात अमावस्येच्या दिवशी १५६४ साली वयाच्या ८४व्या वर्षी दासांनी देह ठेवला.
मन्मनोऽ भीष्ट्वरदं सर्वाभीष्टफलप्रदं । पुरंदरगुरूं वंदे दासश्रेष्ठं दयानिधिम् ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

LikeShow more reactions
Comment
Comments
Anand Bal Joshi
Write a comment...

No comments: