Sunday, April 10, 2016

देहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ३)
आता आपण पुरंदरदासांच्या जीवन चरित्रातील काही निवडक कथा बघणार आहोत. पुरंदरदासांचे वैराग्य या पुढील कथेतून कळते. नवकोट नारायण असा सावकार, पैशासाठी हपापलेले मन असलेला मनुष्य भगवंताची कृपा झाल्यावर तोच पैसा आडका त्याच्यासाठी मातीमोल होऊन जातो. हाच भगवद्कृपेचा महिमा आहे.
विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हा पुरंदरदासांना भेटायला उत्सुक होता. नवकोट नारायण सावकार सर्वस्व त्याग करून हरिदास बनतो ही गोष्ट राजाला खूपच आश्चर्यकारक वाटत होती. अखेर एक दिवस ही भेट झाली. राजाने त्यांचा अन्न वस्त्र आभरणांनी सन्मान केला. पण दासांनी हे सर्व गावातील गोर-गरीबांना वाटून टाकले. राजाने त्यांचा सन्मान केला होता खरा, पण तो शिष्टाचाराचा भाग म्हणूनच. त्याला दासांचे श्रेष्ठत्त्व अजिबात कळले नव्हते.
पुरंदरदास रोज भिक्षा मागत तेव्हा ते राजवाड्यासमोरही भिक्षेसाठी उभे राहत. तेव्हा राजवाड्यातून त्यांना रत्नमोतींनी भरलेल्या सुपाने भिक्षा दिली जात असे. दोन तीन दिवस सतत हे पाहून राजाला संशय आला. राजा व्यासतीर्थांकडे आला आणि म्हणाला, " स्वामी तुम्ही तर पुरंदरदासांना वैराग्यमूर्ति म्हणाता, त्यांच्यावरती गौरव करणारी पदे रचता पण ते तुमचे दास किती लोभी आहेत पहा. तीन दिवस रत्न, मोती देऊनही अजून त्यांची तृप्ति झालेली नाही. नित्य भिक्षेला येतात." हे ऐकून व्यासतीर्थ म्हणाले, "असे होय. चल आपण जाऊन बघुया कसे आहेत दास."
पुरंदरदास गावाबाहेरील मारूतीच्या मंदीरात राहायचे. तिथे राजा आणि स्वामी दोघेही आले. आणि देवळाबाहेर कोपऱ्यात मोती रत्नांचा ढीग पाहिला. दासांची पत्नी भिक्षेच्या झोळीतून खडे कचरा म्हणून जे काही टाकत होती ते दास बाजूला कचऱ्यात जमा करत होते त्याचाच हा ढीग जमा झाला होता. अलिकडे दोन तीन दिवस भिक्षेत खूपच कचरा येतोय नाही? दासांचे आणि त्यांच्या पत्नीचे हे उद्गार ऐकून राजा लज्जित झाला. त्याने व्यासतीर्थ आणि पुरंदरदासांची क्षमा मागितली. आणि दास खरोखरच वैराग्यमूर्ति आहेत असे गौरवोद्गार काढले.
पुरंदरदासांच्या पदांचे महत्त्व - एकदा पाठ चालू असताना व्यासतीर्थांनी पुरंदरदासांची पदे म्हणजे "पुरंदरोपनिषद" असा सन्मान करून ती मध्वाचार्यांच्या सर्वमूल ग्रंथाबरोबर व्यासपीठावर ठेवून त्यांची आरती केली. हे तथाकथित पंडितवर्गाला अजिबात सहन झाले नाही. ह्या सराफाने केलेली पदे भजने ही कितीही सुंदर असली तरी ती आचार्यांच्या सर्वमूलग्रंथांबरोबर ठेवणे म्हणजे खूपच झाले. स्वामी ती तुम्ही आचार्यांच्या ग्रंथांबरोबर ठेवू नका असा आग्रह त्या मंडळींनी धरला. व्यासतीर्थ स्वामी हसले आणि म्हणाले, "मी ती तिथे ठेवलेलीच नाही आहेत. ती आपोआपच मूलग्रंथांकडे खेचली जात आहेत. खोटे वाटत असेल तर तुम्हीच बघा." पंडितवर्गाने एक-एक करून पुरंदरदासांची पदे व्यासपीठावरून भिरकावून द्यायला सुरूवात केली पण काय आश्चर्य ती परत जशीच्या तशी व्यासपीठावर स्थापित होत होती. असा दासांच्या पदांचा महिमा आहे. अर्थात त्यावेळच्या पंडितवर्गाला तो कळलाच नाही. हा दासांच्या इंद्रजाल विद्येचा प्रकार असावा असे म्हणून ते विरोध करतच राहिले.
पांडुरंगाची लीला - पुरंदरदांसांचे दैवत म्हणजे विठ्ठल, पांडुरंग. तीर्थयात्रा संपवून दास पंढरपूर क्षेत्री आले. अनिरूद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव आणि नारायण या पंचरूपी परमात्म्यावर पदे, भजने रचण्याचा दासांचा मानस होता आणि तो भगवंताने येथेच पंढरपूर क्षेत्री पूर्ण करून घेतला.
एका रात्री मृत्तिका शौचास जाताना शिष्य अप्पण्णा भागवतास पाणी बाहेर आणून देण्यास सांगितले अप्पण्णा झोपेतच "हो" म्हणाला आणि झोपी गेला. इकडे दास शिष्याची वाट पाहून कंटाळले. आणि अश्याच अवस्थेत घरी येणेही त्यांना योग्य वाटेना. त्याचवेळी पांडुरंगच अप्पण्णा भागवताचे रूप घेऊन आला आणि त्याने पाण्याचा तांब्या दासांसमोर ठेवला. अंधारात दासांना नीट दिसले नाही पण अंधुकसे दिसले की हा अप्पण्णा भागवतच आहे. दासांनी शुद्धी कार्य आटोपून, "काय रे अप्पण्णा, इतका का वेळ लावलास?" म्हणून तांब्या त्याच्या दिशेने भिरकावला तो त्याच्या डोक्याला लागला. अप्पण्णा, "चूक झाली, गुरूजी" म्हणत निघून गेला.
दास घरी आले. अप्पण्णालाही जाग आली. "झोप आली गुरूजी, विसरलो! हे पहा आत्ता पाणी आणतो." असे म्हणत अप्पण्णा अंगणात आला.
"अप्पण्णा कुठे चाललास अरे शुद्धीत आहेस ना? माझा तांब्या कुठे ठेवलास?" दास म्हणाले.
"कसला तांब्या गुरूजी?" अप्पण्णा.
"अरे आत्ता मगाशी नाही का मी तुला दिला." दास.
"नाही गुरूजी मी तर इथेच झोपलो होतो." अप्पण्णा म्हणाला.
"अरे मूर्खा शेतात तू पाणी आणून दिलेस. आणि उशीर झाला म्हणून रागाने मी तो तुझ्याकडे भिरकावला नाही का?" दास म्हणाले.
"गुरूजी अहो खरोखर मी आलो नव्हतो." अप्पण्णा.
"अस्स! मग शेतात कोण आले होते?" दास विचारत पडले. आणि दासांना कळले. पांडुरंगा! काय रे हे देवा माझ्या हातून नीच कर्म करून घेतलेस? असे म्हणत नामस्मरण करत बसले.
काकड आरतीची वेळ आली होती. नित्याप्रमाणे काकड आरती झाली. नंतर भगवंतास अभिषेक सुरू करण्याच्या वेळी पुजाऱ्यांनी मुकुट काढला तेव्हा पाहिले तर डोक्याला टेंगूळ आले आहे असे दिसले आणि भगवंताच्या डोळ्यातून पाणी येत आहे. पुजाऱ्यांना हे काहीच कळेना. पुरंदरदास देवळात भजन करत बसले होते. सर्वांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. पुरंदरदासांनी तंबोरा खाली ठेवला. गाभाऱ्यात गेले. भगवंताच्या मूर्तीवरून हात फिरवला. आणि म्हणाले,
"देवा कसले रे हे तुझे विडंबन? महाभारत युद्धात भीष्म-द्रोणांच्या बाणापेक्षा माझा तांब्याने केलेला प्रहार इतका तीक्ष्ण झाला का? पाणी घेऊन तूच आलास ना? अप्पण्णा भागवतास झोप तूच आणलीस ना? मग चूक तुझी का माझी? पुरे झाले रे हे विडंबन आता." हात फिरवत असताना हळू हळू टेंगूळ नाहीसे झाले आणि अश्रूही थांबले. दास आनंदपूर्ण साश्रुनयनांनी पुजाऱ्यांना म्हणाले, "काही काळजी करू नका अभिषेक चालू करा. भगवंताला त्याच्या भक्ताबरोबर खेळताना लागले होते."
असे हे दासश्रेष्ठ पुरंदरदास ज्ञान, भक्ती, वैराग्याने परिपूर्ण होते. पुढील भागात त्यांच्या निवडक पदांविषयी, अभंगांविषयी आपण जाणून घेणार आहोत.

No comments: